Monday, June 15, 2015

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू .....

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।। ८।।
हनुमंत पर्वताप्रमाणे उंच, विशाल आणि धिप्पाड आहेत. त्याचे हे भव्य रूप सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे. हनुमंताच विशेष हा कि हनुमंत धिप्पाड आहेत त्याचे शरीर सौष्ठवपूर्ण आहे. प्रमाणबद्ध नेटके आहे. हनुमंत स्थूल नसून सडपातळ आहेत. त्याचे शरीर एखाद्या विद्युल्लते प्रमाणे चपळ आहे. समर्थांनी समाजासमोर, तरुणासमोर बलोपासनेचा आदर्श ठेवला आहे. हनुमंत हे बलोपासनेचे उत्तम उदाहरण आहे. अन्यायाला प्रतिकार करणारा हनुमंत, शत्रूला नामोहरम करणारा हनुमंत, बलवान आहे. या बलोपासनेला समर्थांनी आपल्या जीवनामध्ये महत्वाचे स्थान दिले आहे. समर्थ स्वता उपासनेच्या काळामध्ये तसेच  
नंतरही १२०० सूर्यनमस्कार घालत होते. कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर सर्व प्रथम आपले शरीर, आपले आरोग्य उत्तम असले पाहिजे. याची जाणिव हनुमंताना होती. त्यांचाच आदर्श समर्थांनी समोर ठेवला होता. मन, मनगट आणि मेंदू याचे उत्तम स्वास्थ्य दोघांनीही राखले होते. हे स्तोत्र केवळ हनुमंताची स्तुती करण्यासाठी लिहिलेले नाही तर यामध्ये त्याच्याप्रमाणे बलवान, निर्भय, होण्यास सांगतात. तसेच त्याच्या भक्तीचे वर्णन करून भगवद भक्तीचा आदर्श आपल्या समोर ठेवतात. हनुमंताच्या गुणाचे, पराक्रमाचे, वर्णन करून आपल्याला समर्थ सतत सावध करतात आणि त्याच्या सारखे आचरण करण्यास प्रवृत्त करतात.
समर्थांनी नि:सत्व झालेल्या समाजाला बलोपासनेची ताकद देऊन त्यांचे शाररीक व मानसिक बळ वाढवले. तरुणाची मने तसेच अंत:कारण पराक्रमाने, शौर्याने भारले गेले तरच दुर्जनांमधील राक्षसांचा नाश शक्य आहे हे जाणण्यातच समर्थांचे द्रष्टेपण आहे.
हनुमंताच्या पिळदार शरीराचे वर्णन वाचताना समर्थाच्या बलोपासनेचे स्मरण झाले..

हनुमंताचे वर्णन उपनिषदात ‘अस्थूलम’ असा केला आहे. अत्यंत चपळ आहेत. पवनपुत्र हनुमान वाऱ्याचे स्वरूप आहेत. समर्थ म्हणतात,
‘निश्चळावेगळा वायू | चंचला वर्तवी सदा |’
वायू नेहमी निशालाहून वेगळा म्हणजेच चंचल असतो.
देव तो हाची जाणावा | सर्व देहांतरी वसे ||
येकागे पाहतां वायो | येकागे पाहतां हरि ||
चंचलत्वे जगज्ज्योती | आत्मा त्यासीच बोलिजे ||
सर्व देहामध्ये वावरणारा वायू हा देवच समजावा. ही चंचल जगज्ज्योती म्हणजेच आत्मा होय. हनुमंत अतिशय चपळ आहेत. एखाद्या विद्युल्लते प्रमाणे त्यांचे तेज आहे. त्यांच्या तेजाने डोळे दिपून जातात.

आळस या दुर्गुणाचा लवलेश त्यांच्यामध्ये आढळत नाही त्यामुळेच हा वायू पुत्र अत्यंत चपळ आहे. समर्थ आपल्या उपदेशात आळसाचा निषेध करतात. आळस हा आपला शत्रू आहे हे वारंवार दासबोधामधून आपल्या मनावर बिंबवतात. आळस नसेल तर मनुष्य कसा सतत कार्यरत आणि उत्साही राहतो यासाठी आपल्या समोर हनुमंताचा आदर्श ठेवतात....क्रमशः 

No comments:

Post a Comment