Thursday, June 18, 2015

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ....

धनधान्यपशुवृद्धीपुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादीस्तोत्र पाठें करूनियां ।।१४।।

समर्थ आता फलश्रुतीकडे वळतात. सामान्य माणसाची ही प्रवृत्ती असते कि एखादी गोष्ट केल्यानंतर मला काय मिळेल. म्हणून समर्थ म्हणतात मारुतीची उपासना केली तर तुला सर्व वैभव प्राप्त होईल. कोणते वैभव तर ते या श्लोकात स्पष्ट केले आहे.
खरे तर हा श्लोक अनेक पाठामध्ये नाही. काहींच्या मते हा श्लोक समर्थांचा नाही. तो नंतर कोणीतरी यामध्ये समाविष्ट केला आहे. पण तरी आपण या श्लोकाचा आदर राखून चिंतन करू.
या श्लोकातील फलप्राप्ती वाचून प्रापंचिक खुश होणार यात शंका नाही. पण कालपर्यंत आपण जे चिंतन केले त्यामध्ये समर्थ आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. मग ही उंची गाठल्यावर पुन्हा आपले मन यामध्ये रमेल का? असा प्रश्न पडला. शून्याचा भेद केल्यानंतर आपली वृत्ती बदलते हे नक्की. भौतिक जगात जगत असताना धनधान्य, पुत्रपौत्र या सगळ्या गोष्टी असणारच आहेत. पण या उपासनेत समर्थ इतक्या उंचीवर नेऊन ठेवतात कि भौतिक जगातील ही संपन्नता असली नसली तरी तो कायम आनंदी रहातो. कारण त्याला खरे वैभव प्राप्त झाले आहे. शून्याचा भेद झाला कि मन सर्वातून अलिप्त होते. भौतिक जगात व्यवहार चालू असले तरी मन मात्र सतत भगवंत समीप त्याच्या चिंतनात रमलेले असते. आता तो पूर्ण समाधानी आहे.
या स्तोत्र पठणाने रूप, विद्या प्राप्त होते. योग्य उच्चार करून हे स्तोत्र म्हंटले तर खरेच एक प्रकारचे बळ आपल्याला प्राप्त होते. आत्मविश्वास निर्माण होतो, चेहेऱ्यावर प्रसन्नता येऊन तेज निर्माण होते. आत्मविश्वास प्राप्त झाल्याने बुद्धीला देखील तेज येते. हा विषय केवळ चर्चा करण्यापुरता मर्यादित नसून अनुभूती घेण्याचा आहे. मनापासून उपासना करून याची प्रचीती प्रत्येकाने घ्यावयाची आहे.
......क्रमशः

No comments:

Post a Comment