Friday, June 19, 2015

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही.....

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।। १५।।

हनुमंताच्या उपासनेने काय घडते तर नकारात्मक शक्तींचा नाश होतो, नकारात्मक विचारांचा नाश होतो. हनुमंताच्या दर्शनाने भूतप्रेत, समंध इत्यादी अघोरी शक्तींकडून होणारा त्रास, अनेक व्याधी नष्ट होतात, सर्व चिंता समूळ नष्ट होतात. खरे तर सर्व सामान्य माणूस आपल्या चिंतामध्ये, आपल्या दु:खामध्ये इतका ग्रस्त असतो की पूजापाठ करत असताना देखील त्यामध्ये त्यांना आनंद मिळत नाही. हनुमंताचे दर्शन घ्यायचे म्हणजे केवळ मूर्तीचे दर्शन आणि केवळ मूर्तीची उपासना नाही. तर या सगुणाच्या पलिकडे जाऊन जे निर्गुण तत्व आहे ते जाणून घेऊन त्याचाशी एकरूप व्हायचे आहे तो आनंद अनुभवायचा आहे. समर्थांची उपासना इतकी व्यापक आहे. या उपासनेने हनुमंत केवळ आपल्या चिंता दूर करत नाहीत तर त्याचा समूळ नाश करतात.
पण ही उपासना करताना भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवणे अपेक्षित आहे. आपण सामन्य जीव शेकडो चिंतांचे ओझे घेऊन वावरत असतो. जेव्हा आपण चिंताग्रस्त असतो तेव्हा आपली उपासना ही यांत्रिक पद्धतीने घडत आहे असे समजावे. भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून जेव्हा आपण ‘अचूक प्रयत्न’ करत राहतो तेव्हा आपल्याला चिंता करण्याचे कारण नसते. परंतु आपला आपल्यावर तसेच भगवंतावर देखील विश्वास नसल्याने सतत चिंता, काळज्या यांनी आपले जीवन ग्रस्तच राहते. यामुळेच सतत दु:खला आपल्याला सामोरे जावे लागते.

या सर्वातून मुक्त करणारी अशी ही उपासना आहे. समर्थांनी स्वता ही उपासना केली आणि आपल्याला देखील या उपासनेचा आनंद घेण्यास प्रवृत्त करतात..... 


भगवती सीता अशोक वनात असताना त्याठिकाणी ती राक्षसांच्या घेराव्यात आहे. भूतप्रेत इ. अधोरी शक्ती तसेच राक्षस तिला नानाप्रकारे त्रास देउन घाबरवत आहेत. साक्षात रावण तिला धमक्या देत आहे. मायावी शक्तीचा वापर करून भगवतीच्या मनात भीती निर्माण करत आहे. अशा या परिस्थितीत भगवती अतिशय चिंतीत आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीत  आपले लांब केस अशोक वृक्षाला बांधून स्वत:ला टांगून प्राणत्याग करावा असे तिला वाटू लागते. परंतु तिच्या हृदयात एक प्रकारचा आनंद भरलेला आहे. आणि तो आनंद तिला या विचारा पासून परावृत् केले आहे. अत्यंत शोकग्रस्त असलेल्या भगवतीला जेव्हा हनुमंताने म्हंटलेले श्रीराम नाम तिच्या कानावर पडले तेव्हा ती अत्यंत हर्षित झाली. हनुमंताला पाहून प्रथम जरी भगवतीला भीती वाटली असली तरी हनुमंताच्या दर्शनाने तिच्या हृदयात जो आनंद उसळला त्यावरून तिची खात्री पटली कि हा रामाचा दूत आहे आपला हितचिंतक आहे.

रामायणातील या भागाचे चिंतन करताना समर्थ नामस्मरणाचे जे महत्व स्पष्ट करतात त्याचे महत्व लक्षात येते. हनुमंत काय भगवती सीता काय श्रीराममय झाले आहेत. भगवती सीतेच्या मनात या राक्षसांच्या त्रासाने क्षणिक कं होईना नकारात्मक विचार आला पण तिचे हृदय भगवत चिंतनाने इतके भरून गेले आहे कि जरी नाकारात्क विचारांचा तरंग मनामध्ये आला तरी तो फार काळ टिकला नाही. इतके सामर्थ्य या नामामध्ये आहे. कोणतीही उपासना करताना ती केवळ यांत्रिक पद्धतीने न होता सहज घडली पाहिजे. ज्या प्रमाणे आपण श्वास सहज घेतो आणि सोडतो, त्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. किंवा अशी क्रिया आपण करत आहोत याची आपल्याला जाणीवही नसते इतकी सहजता त्यामध्ये येते. त्याच पद्धतीने आपले नाम सहज पद्धतीने आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे.....क्रमशः

No comments:

Post a Comment