Monday, June 16, 2025
समर्थांचे षड्रिपू निरूपण प्रकरण
Saturday, May 31, 2025
मद म्हणजे “मीच मोठा” या विचारात हरवून जाणं.
यश, सौंदर्य, पैसा, ज्ञान याचा गर्व मनात रुजतो… आणि नम्रता गळून जाते.
असं झालं की माणूस इतरांना कमी समजू लागतो – आणि तिथून सुरू होतो अधःपात… म्हणून समर्थ या विकाराचा निषेध करतात
जय जय रघुवीर समर्थ 🙏
https://youtu.be/xXEQ1mu7zhU?si=YW34iDI2Q6MmMP6m
ऐका श्री समर्थ वाणी वर 🙏
Tuesday, May 20, 2025
समर्थ शिष्यांची मांदियाळी
||श्रीराम ||
समर्थ शिष्यांची मांदियाळी
डॉ. सौ. माधवी महाजन
madhavimahajan17@gmail.com
महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. या संत मांदियाळीमध्ये समर्थ रामदासस्वामी यांचे व्यक्तिमत्व अद्वितीय होते. त्यांनी केलेले बारा वर्षाचे पुरश्चरण आणि बारा वर्षे केलेले भारतभ्रमण तसेच याकाळात केलेले सूक्ष्म निरीक्षण यातून त्यांनी आपले कार्य, कार्यक्षेत्र निश्चित केले. भोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर आपल्याला जे जनजागृतीचे काम करायचे आहे ते एकट्याचे काम नाही हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक माणसे जोडली. ही माणसे जोडताना देखील आपल्या कार्याला उपयुक्त अशाच तरुणांची त्यांनी निवड केली. मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली, लोकांना बलोपासनेचे महत्त्व पटवून दिले. समर्थांनी केलेल्या अलौकिक कार्यात त्यांनी केवळ मंदिरांची स्थापना आणि देवांचा उत्सव एवढेच केले नाही तर संपूर्ण भारतभर आपले मठ स्थापन करून त्या त्या ठिकाणी योग्य त्या शिष्याची महंत म्हणून नेमणूक केली. ‘महंते महंत करावे’ अशी शिकवण शिष्यांना देऊन या शिष्यांचे आणि मठांचे जणू जाळेच त्यांनी देशभर पसरवले. समर्थांच्या कार्यात त्यांच्या शिष्यांचे योगदान देखील तितकेच महत्त्वाचे आहे. समर्थांनी ज्या विश्वासाने महंतांवर मठाचे अधिकार सोपविले होते त्या अधिकाराला शोभेल असेच भरीव कार्य प्रत्येकाने केलेले दिसून येते. समर्थांच्या शिकवणीचा समाजात प्रचार करून जनजागृतीचे कार्य पार पाडत असताना या शिष्यांनी आपली परमार्थिक उंची कायम ठेवली. याशिवाय अत्यंत प्रभावी वाड्मय निर्माण करून आपल्या स्वतंत्र विचारांचा ठसा उमटवला आहे. विलक्षण तेजस्वी आणि समर्थ असे अनेक शिष्य समर्थांनी निर्माण केले. समर्थांचे कार्य व्यापक होते त्यामुळे त्यांचा शिष्यपरिवार देखील फार मोठा होता.
समर्थ जेव्हा शिष्य पारखून घेत तेव्हा ते लहान व चुणचुणीत मुलांना अधिक प्राधान्य देत. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना आपल्या कार्याच्या दृष्टीने तयार करीत. अशी तीक्ष्ण, सखोल बुद्धीची मुले समर्थांच्या कठोर परीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडत आणि स्वतःला गुरुसेवेत वाहून घेत असत. समर्थांची स्वतःची अशी ग्रंथ रचना उपलब्ध आहेच परंतु त्यांच्या शिष्यांनी देखील प्रचंड प्रमाणात वाड्मय निर्मिती केलेली दिसते. समर्थांचे हे शिष्य व त्यांची ग्रंथरचना हे समर्थ संप्रदायाचे एक वेगळेपण ठरते.
* उद्धवस्वामी: समर्थांचे सर्वांत पहिले शिष्य उद्धवस्वामी. नाशिक पंचवटी पासून साधारण तीन मैलावर टाकळी येथे उद्धवस्वामींचा मठ आहे. येथून जवळच नंदिनी आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे. याठिकाणीच समर्थांनी १२ वर्षे नदीच्या पत्रात उभे राहून पुरश्चरण केले. उद्धवस्वामींना लहानपणीच समर्थांजवळ राहून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळण्याचे भाग्य लाभले होते. अत्यंत बुद्धिमान अशा उद्धवाचे समर्थांना विशेष कौतुक होते. वैराग्य ही उद्धवाला लाभलेली ईश्वरदत्त देणगी होती. समर्थ सहवासात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या विषयीचे संस्कार लहान वयातच न कळत त्यांच्यावर घडले होते. समर्थांच्या मांडीवर बसून मौजीबंधन होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. समर्थांचा पहिला शिष्य, समर्थ स्थापित टाकळीचा पहिला मारुती आणि पहिला मठ याचे वयाच्या आठव्या वर्षी मठाधिपती होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. समर्थ भारत भ्रमणाला निघताना त्यांचा बारा वर्षाच्या तपश्चर्येचा आदर्श उद्धवा समोर ठेवून गेले होते. आपल्या सदगुरुं प्रमाणेच उद्धवाने बारा वर्षे गायत्री मंत्राचे पुरश्चरण केले व रामनामाचे तेरा कोटीचे अनुष्ठान केले. बारा वर्षानंतर जेव्हा त्याची भेट झाली तेव्हा त्यांनी बऱ्याच मंडळीना भक्तिमार्गाला लावले होते. वयाच्या पंच्याऐंशी वयापर्यंत समर्थांप्रमाणेच त्यांनी देखील लोकसंग्रहाचे आणि संघटनेचे महान कार्य केले. सारंगपूरमधील समर्थ संप्रदाय आणि प्रसाराचे कार्य उत्तम पार पडावे यासाठी उद्धव स्वामीना सारंगपूरचे मठाधिपती केले. समर्थांचे पुरुष शिष्यांपैकी दोन मठांचे अधिपत्य करण्याचा बहुमान फक्त उद्धवस्वामीनाच लाभला. एका प्रसंगात समर्थांनी त्यांचे नाव शिव असे ठेवले होते तेव्हा पासून लोक त्यांना शिवरावस्वामी असे म्हणू लागले.
उद्धवस्वामींचा व्यासंग दांडगा होता. समर्थांची प्रत्येक शिकवण त्यांच्या मनावर ठसली होती. बलोपासना, रामोपासना, उत्तम संघटन यासर्व गोष्टी उद्धवस्वामी मध्ये पाहावयास मिळतात. अनेक प्रसंगातून पराकोटीची गुरुनिष्ठा उद्धवस्वामीमध्ये पहावयास मिळते. समर्थांचा अखंड सहवास लाभल्यामुळे त्यांनी समर्थांचे चरित्र लिहिले असावे असा उल्लेख ग्रंथामधून सापडतो परंतु अजूनही ते उपलब्ध झालेले नाही. शिवाजीमहाराजांचे निर्वाण झाले तेव्हा त्यांनी त्यांच्यावर काही श्लोक लिहिलेले उपलब्ध झालेले आहे. परंतु त्यांची कविता फारशी आढळत नाही.
* कल्याणस्वामी: समर्थांच्या शिष्य परंपरेत कल्याणस्वामींचे स्थान पट्टशिष्यांचे होते. गुरुशिष्य परंपरेत कल्याणस्वामींचे नाव आदराने घेतले जाते. कल्याण म्हणजे गुरुनिष्ठा, गुरुसेवेची पराकाष्ठा. आपल्या सद्गुरूंशी, त्यांच्या विचारांशी एकरूप झालेला असा शिष्य विरळाच. उत्तम हस्ताक्षर, टापटीप, निरालासता, कर्तव्यतत्परता या गुणांनी समर्थांचे लक्ष वेधले गेले होते. त्यांचे मूळ नाव अंबाजी पुढे समर्थांनी त्याचे नाव कल्याण असे ठेवले. अंबाजी कसे लिहितो हे पाहण्यासाठी समर्थांनी एक सवयी म्हंटली आणि अंबाजीने ती तत्काळ लिहून दाखवली. त्यांची तीव्र स्मरणशक्तीचे समर्थांना कौतुक वाटले. समर्थांनी त्याची पारख करून अंबाजी तसेच त्यांचे बंधु दत्तात्रय यांचा समावेश संप्रदायामध्ये करून घेतला. सुंदर हस्ताक्षर असून देखील समर्थांनी त्यांना आपल्या झोळीतून उत्कृष्ट हस्ताक्षराचा कित्ता दिला. तो कित्त गिरवून कल्याणाने आपले हस्ताक्षर अधिक सुंदर केले.
कल्याणस्वामीच्या चरित्रातील सर्व कथांमधून त्यांची सदगुरुंवरील पराकोटीची निष्ठा पहावयास मिळते. सदगुरुंवर त्यांचा इतका प्रगाढ विश्वास होता की स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नसत असा हा शिष्योत्तम होता. ‘खंड नाही अखंड ध्यानी' अशी समर्थांबाबत त्यांची अवस्था होती. कल्याणस्वामी ‘दिसामाजी काही तरी लिहावे' या समर्थांच्या शिकवणी प्रमाणे नित्य लेखन करीत असत. त्यांचे वाड्मय विपुल प्रमाणात आहे. महावाक्य, पंचीकरण ग्रंथ, शुक आख्यान, ध्रुवाख्यान या त्यांच्या लिखाणातून त्यांची परमार्थिक तसेच अध्यात्मिक उंची लक्षात येते. समर्थांप्रमाणेच त्यांनी देखील नामसाधनेला खूप महत्व दिले. ‘राम नामाचे भांडार लुटा' असाच संदेश ते साधकांना देतात. कल्याणस्वामी लिखित अष्टपदी, सवाया, भूपाळ्या यामधून नामस्मरणाचे महात्म्य वर्णन केले आहे. तसेच त्यांनी रचलेल्या आरत्यांमधून त्यांच्या गुरूनिष्ठेचे उत्कट प्रतिबिंब पडलेले दिसते.
समर्थांनी सत्संग, सद्गुरू, भगवद चिंतनाचे महत्व स्पष्ट केले. स्वतःला आलेल्या प्रचीतीतूनच त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. कल्याणस्वामीनी देखील या सर्वांची अनुभूती घेऊन पुढील सांप्रदायिकानां मार्गदर्शन केले.समर्थांच्या पश्चात देखील कल्याणस्वामी समर्थांच्या शिकवणी प्रमाणे आयुष्य जगले. त्यांनी विपुल ग्रंथ रचना केली तसेच आपला शिष्य संप्रदाय देखील वाढवला. सदगुरुंशी एकरूप झालेल्या कल्याणस्वामीच्या गुरुनिष्ठेला इतिहासात तोड नाही.
* दिनकरस्वामी: समर्थांच्या प्रमुख शिष्यांपैकी ‘दिनकर' हे होत. दिनकरस्वामी समर्थांचे समकालीन शिष्य. समर्थांच्या शिष्य वर्गात दिनकरस्वामींची योग्यता फार मोठी आहे. लहानपणापासूनच दिनकरस्वामींचा ओढा परमार्थाकडे होता. त्यांची वृत्ती परोपकारी होती. त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी होती. ते उत्तम वैदिक शास्त्री, पुराणिक, वैद्य होते. त्यांना असाधारण मंत्रशक्ती, धर्मशास्त्र विचार, तर्कभाषा तसेच फलज्योतिष, पत्रिका, लग्नसाधन यासर्व ज्योतिष विद्यांचे ज्ञान होते. याशिवाय परमार्थातहि नित्यानित्य विवेक, अखंड अध्यात्म निरुपण, अशा अनेक विषयात ते निष्णांत होते.
समर्थांनी दिनकरस्वामींना नगरप्रांतातील तीसगावी मठ स्थापून दिला. त्यांचे अनेक शिष्यगण होते. त्यामध्ये निस्पृह, प्रपंची,राजे, महाराजे, अनेक मराठे जहागीरदार असे अनेक लहानथोर शिष्य होते. त्यांनी स्वतःचे समृद्ध वाड्मय निर्माण केले. अनेक अभंग, सवय, पदे, श्लोक इ.स्फुट रचना केली. याशिवाय त्यांनी ‘स्वानुभवदिनकर’ नावाचा प्रासादिक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी स्वतःच्या अनुभवाचे परमार्थपर विचार ग्रंथित केले आहेत. तसेच वेदांत आणि भक्तिमार्ग याचे सुरेख वर्णन या ग्रंथात आले आहे. या विवेचनावरून दिनकरस्वामींची विद्वत्ता तर दिसून येतेच पण त्याच बरोबर प्रभू रामचंद्र आणि समर्थांविषयीची मनात असणारी अपार श्रद्धा याचे दर्शन घडते. दासबोध खालोखाल महत्वाचा मानला जाणारा हा ग्रंथ प्रापंचिकाबरोबर पामार्थिक व्यक्तींनाही तितकाच उपयोगी आहे. आपल्याला मिळालेला नरदेह ही एक सुवर्णसंधी आहे हे जाणून त्यांनी त्यानुसार सद्गुरूच्या आधारे आपला मार्ग आक्रमिला. भक्ती, ज्ञान, आणि वैराग्य हेच त्यांच्या वाड्मयामधील प्रमुख विषय आहेत. त्यांच्या वाड्मयावर समर्थांच्या विचारांची जरी छाप दिसत असली तरी त्यांचे स्वतंत्र कर्तृत्व दिसून येते.
* भीमस्वामी: भीमस्वामी हे तंजावरचे मठाधिपती होते. मूळचे शहापूरचे असणारे भीमस्वामी समर्थांनी उपदेश दिल्यामुळे ते तंजावरला गेले. भीमस्वामी प्रापंचिक होते. त्यांच्या आजीने समर्थांचा अनुग्रह घेतला असल्याने भीमस्वामीनां समर्थांचा सहवास लहानपणापासून लाभला होता. त्यांनी समर्थांचे लघुचरित्र लिहिले. या चरित्रलेखनामागे त्यांची विरही भक्ताची भूमिका आहे. आपले सद्गुरू परब्रह्मरूप पावलेले होते ही त्यांची भावना यामध्ये प्रकर्षाने जाणवते.
* बाळकराम: बाळकराम हे नाव फारसे परिचित नसलेले. व-हाडांत कारंजा मधील दोन रामदासी मठातील एक मठ बळकाराम यांच्या परंपरेतील आहे. समर्थांच्या उपदेशामुळे कारंजा येथे राहावयास येऊन त्यांनी मठस्थापना केली. यांचा मोठा ग्रंथ उपलब्ध नाही. परंतु त्यांनी लिहिलेली स्फुटप्रकरणे श्लोक, अभंग, आरत्या उपलब्ध आहेत. समर्थांनी बाळकराम यांना जो उपदेश केला होता तो त्यांनी ५४ श्लोकांत गोवला आहे. त्यांची कविता सहज सुलभ दिसते.
* मेरुस्वामी : समर्थांनी अनेक शिष्य निर्माण केले हीच परंपरा त्यांच्या शिष्यांनी देखील त्यांच्या पश्चात पुढे चालू ठेवली. समर्थांचे शिष्य अनंत मौनी यांचे शिष्य मेरुस्वामी. अनंत मौनींचा अनुग्रह मेरुस्वामीना मिळाला होता. त्यांनी विपुल प्रमाणात ग्रंथ रचना केली. यापैकी त्यांचा रामसोहळा हा ग्रंथ दासबोधापेक्षा मोठा आहे. त्यामध्ये षडदर्शनाचे सार आले असून गुरूने शिष्यास दिलेल्या उपदेशांचे टिपण पण दिसते. मेरुस्वामीचे भाषाप्रभुत्व आणि प्रसंगवर्णन करण्याचे प्रभुत्व याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो.
* गिरीधरस्वामी : समर्थ शिष्या वेणास्वामी यांच्या शिष्या बाईयाबाई यांचे शिष्य गिरीधर. हे समर्थांचे समकालीन नसले तरी त्यांना समर्थांचा सहवास थोडाफार लाभला होता. समर्थ वाड्मय सर्वसामान्यांना कळावे या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी समर्थांच्या वाड्मयावर तसेच समर्थांचे उपास्य दैवत प्रभुरामचंद्र याविषयी विपुल प्रमाणात लेखन केले. त्यांनी लिहिलेला समर्थप्रताप या ग्रंथाला विशेष स्थान आहे. एखाद्या घटनेतील बारकावे मार्मिकपणे टिपून ती जिवंत स्वरुपात वर्णन करण्याचा त्यांचा हातखंडा होता. समर्थांचे मूर्ती वर्णन अत्यंत बारकाईने त्यांनी केले आहे. तसेच समर्थांचे जीवनकार्य, त्यांचे वाड्मय, त्यांचे देशाटन अशा अनेक घटनांचे बारकाईने वर्णन केले आहे. हा ग्रंथ म्हणजे गुरूविषयीच्या श्रद्धेचा भाग आहे.
गिरीधरस्वामीनी विपुल प्रमाणात वाड्मय निर्मिती केली. त्यांचे प्रकाशित आणि अप्रकाशित असे मिळून ४० ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आरत्या इ. प्रचंड लेखन उपलब्ध आहे. या सर्वात समर्थप्रताप या ग्रंथाला मनाचे स्थान आहे. समर्थांचे जीवन कार्य यामध्ये त्यांनी रेखाटले आहे. त्यांच्या सहज सुलभ शैलीमुळे ते वाचनीय झाले आहे. समर्थ तसेच समर्थ संप्रदाय याविषयी अनेक अंगांनी लेखन करणाऱ्या गिरिधरांचे वाड्मयीन कार्य गौरवास्पद आहे.
* आत्मारामबुवा येकेहाळीकर हे कल्याणस्वामीचे प्रमुख शिष्य शिवराम यांनी आपले शिष्य रामचंद्र यांना समर्थ चरित्र सांगितले जे त्यांना कल्याणस्वामीनी सांगितले होते. रामचंद्र यांनी आपले शिष्य आत्माराम यांना हे चरित्र सांगितले. या माहितीच्या आधारे त्यांनी दासविश्रामधाम या प्रचंड ग्रंथाची निर्मिती केली. ज्याला श्री.देव यांनी संप्रदायाचा विश्वकोश या शब्दात गौरवले आहे. यामध्ये समर्थांचे समग्र चरिते पहावयास मिळते. हा ग्रंथ ओवीवृत्तात गद्यासारखा असून त्याचा एकंदर थाट रामदासी वाड्मयाला शोभेल असाच आहे. यामध्ये अनेक संत कवींची रचना पहावयास मिळते.
समर्थांनी आपला संप्रदाय निर्माण केला तो विशिष्ट हेतू समोर ठेवून निर्माण केला. त्यांना जी धर्मस्थापना करावयाची होती त्यासाठी समाजसुधारणा तितकीच महत्वाची होती. म्हणूनच त्यांनी बलोपासना मुलांमध्ये रुजवली त्याचा प्रचार याच मुलांच्या माध्यमातून केले. आपला उपदेश गावोगावी, लोकांच्या मनामनात याच शिष्यांच्या माध्यमातून पोहोचवला. आपल्या शिष्यांना भिक्षेची दीक्षा दिली. यामागे त्यांचे व्यापक विचार होता. भिक्षेच्या निमित्ताने लोकस्थितीचे जवळून अवलोकन करणे हा महत्वाचा उद्देश होता. भिक्षेच्या निमित्ताने सर्व शिष्य सर्वत्र निर्भयपणे वावरत असत. यानिमित्ताने समर्थांचे प्रखर विचार सर्वत्र पोहोचवणे सहज शक्य होत होते. समर्थांनी एका विशिष्ट वर्गातीलच शिष्य करून घेतले नाहीत. समर्थांच्या शिष्य वर्गात साधे गृहस्थाश्रमी होते, शिवाय महत्वाच्या पदावर असलेले अनेक वतनदार व अधिकारी पुरुष होते. समर्थ संप्रदायाचे दुसरे वैशिष्ट्य हे की त्यांनी आपल्या संप्रदायात स्त्रियांचा समावेश केला. यामध्ये विवाहित स्त्रिया होत्या तसेच विधवा देखील होत्या. आक्कास्वामी, वेणाबाई, या व्यतिरिक्त द्वारकाबाई, गंगाबाई,अन्नपूर्णाबाई, अशा वीस स्त्री शिष्यांचा उल्लेख ‘समर्थप्रताप' ग्रंथात आढळतो. या शिष्यांना ग्रंथरचनेचा अधिकार समर्थांनी दिला होता. त्यांच्या संप्रदायात सर्वांना कीर्तनाचा अधिकार नसला तरी वेणास्वामीसारख्या शिष्या वेळप्रसंगी कीर्तनाला देखील उभ्या राहत. यावरून त्यांनी स्त्रियांना किती अधिकार प्राप्त करून दिला होता याचे दर्शन घडते. त्याकाळचा विचार करता स्त्रियांना त्यांनी देलेले स्थान, त्यांना प्राप्त करुन दिलेले अधिकार हे धाडसाचेच पाउल ठरते. या सर्व शिष्य आणि शिष्यांची विपुल ग्रंथ संपदा पहावयास मिळते.
समर्थांनी आपल्या संप्रदायाच्या लक्षणात राजकारणाचा राजरोसपणे समावेश केला होता. परंतु समर्थांच्या पश्चात त्यांच्या शिष्यांनी चतु:सुत्रातील राजकारणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून हरिकथा निरुपणाला अधिक महत्व दिलेले दिसते. अत्यंत प्रासादिक तसेच सहज सुलभ भाषेमध्ये विपुल प्रमाणात वाड्मय निर्मिती, अनेक शिष्य निर्माण करून संप्रदाय वाढवणे, भिक्षामिसे लोकांतात राहणे, एकांतात राहून आपली पारमार्थिक उंची वाढवणे या सर्व बाबतीत समर्थ शिष्य अग्रेसर ठरलेले दिसतात. परंतु समर्थ हयात असताना संप्रदायाची वाढ जेव्हढ्या झपाट्याने आणि ज्यापद्धतीने झाली तशा प्रकारे पुढे वाढ झाली नाही. याला कारण समर्थांचे अद्वितीय कर्तृत्वशक्ती. त्यांच्या पश्चात मात्र त्यांच्या प्रमाणे अधिकारवाणीने व स्पष्टोक्तीने उपदेश करणारा कर्तुत्ववान मठाधिपती दुर्दैवाने निर्माण झाला नाही. समर्थांच्या पश्चात अनेक वर्ष संप्रदायाचे कार्य पुढे चालू राहिले तरी जो धडाका समर्थांचा होता तो राहिला नाही.
आजही समर्थ वाड्मय, त्यांचे प्रखर विचार आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे ठरतात. त्याचा योग्य उपयोग करून घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करणे आपल्याला सहज शक्य आहे. समर्थांनी त्या काळात जे सर्वांगीण कार्य केले त्यामध्ये संघटन, एकात्मता यावर भर दिला ज्याची गरज आज देखील आहे. यत्न तो देव जाणावा ही समर्थांची उक्ती प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते तसेच त्यांचे सकारात्मक विचार निश्चितच सकारात्मक कृती करण्यास प्रवृत्त करते. मनातील नैराश्य घालवणारे, आत्मविश्वास वाढवणारे समर्थांचे समर्थ विचार आजही आम्हाला मार्गदर्शक ठरतात. समर्थ आजही आपल्या विचारांच्या माध्यमातून आपल्यात राहून आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. त्यासाठी सावधपणे, उघड्या डोळ्यांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे, तरच त्याचा प्रत्यय येणार आहे.
जय जय रघुवीर समर्थ
Sunday, April 27, 2025
समर्थांची नामस्मरण भक्ती
|| श्रीराम ||
समर्थांची नामस्मरण भक्ती
डॉ. माधवी संजय महाजन
भारतीय तत्वज्ञानात ‘ब्रह्म हेच अंतिम सत्य’ सांगितले गेले आहे. यामध्ये, मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर परमेश्वर प्राप्ती हे मुख्य उद्दिष्ट साध्य करून जीवाने त्याच्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे संगितले आहे. मनुष्य जन्माचे सार्थक कसे करावे याविषयी प्राचीन ग्रंथांमधून तसेच संत वाड्मयामधून अचूक मार्गदर्शन केले आहे. चराचरामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे हे सत्य मायेमध्ये गुरफाटलेल्या जीवाला असत्य वाटते. त्याला केवळ आपला देह, हे मायेनी अच्छादलेले जगत हेच सत्य वाटत रहाते. शाश्वत सोडून अशाश्वताच्या मागे धावणार्या या अज्ञानी जीवांना सर्व संतांनी अत्यंत कळकळीने उपदेश करून वारंवार सावध केले. हा उपदेश करताना त्यांनी आधी प्रचिती घेऊन मगच उपदेश केला. समाजाकडून त्यांना कितीही त्रास झाला तरी ‘बुडते हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥’ अशी त्यांची वृत्ती असल्यामुळे त्यांना त्रास देणार्यांचे देखील कल्याण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. महाराष्ट्र अशा संत विभूतींनि समृद्ध आहे. या संत विभूतींमध्ये समर्थ रामदासस्वामींचे नाव आदराने घेतले जाते.
समर्थ रामदासस्वामींनी आपल्या प्रबोधनामधून, वाड्मयातून भौतिक जगात वावरतांना, उत्तम गुणांचा अंगीकार करून कसे यशस्वी जीवन जगावे याचे अचूक मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गावर चालताना समृद्ध आणि संपन्न होण्यासाठी साधनेची अचूक दिशा देखील दाखविली. आध्यात्मिक मार्गावरील प्रगतीपथावरून वाटचाल करताना आपल्याला प्राप्त झालेल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे असे ते वारंवार सांगतात.
नरदेहीं आलियां येक | कांहीं करावें सार्थक |
जेणें पविजे परलोक | परम दुल्लभ जो || दास. २/४/५ ||
भगवंताचा शोध घेणे हे माणसाचे सर्वोत्तम ध्येय आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या आयुष्यात काया, वाचा, मनाने भगवंताची मन:पूर्वक उपासना करावी आणि त्याला प्राप्त करून घ्यावे असे समर्थ सांगतात. नरदेह प्राप्त झाल्यानंतर जर आत्महित साधता आले नाही तर असे जीवन मृतवत समजावे असे अत्यंत परखडपणे त्यांनी सांगितले आहे. समर्थांनी आपल्या प्रबोधनातून केवळ एकांगी मार्गदर्शन केले नाही तर प्रत्येक विचार कृतीत आणायचा असेल तर त्यासाठी अचूक दिशा दाखवून साधकाचे तारू भरकटणार नाही याची काळजी घेतली आहे. भगवतप्राप्तीच्या या मार्गामध्ये त्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी साधूसंतांनी भक्तीचे महत्व सांगितले. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या ग्रंथ संपदेमध्ये भक्ति निरुपणाला विशेष महत्व दिले.
समर्थांचा श्रीमद दासबोध हा ग्रंथ गुरुशिष्यांचा संवाद आहे आणि यामध्ये भक्तिमार्ग सविस्तर सांगितला आहे. या ग्रंथामध्ये समर्थांनी एक संपूर्ण दशक नवविधभक्तीसाठी वाहिला आहे. भक्तिमार्गावरून वाटचाल करताना भगवंताचे भजन कसे करावे, आपले चंचल मन त्यामध्ये कसे गुंतवावे याविषयीचे सुस्पष्ट मार्गदर्शन त्यांनी केले आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये प्रल्हादाने आपल्या वडीलांना नवविधा भक्तीचे स्वरूप स्पष्ट करताना म्हटलेला श्लोक सर्वपरिचित आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्॥
या नवविधा भक्तीच्या माध्यमातून सर्वोत्तमाचा स्वीकार करून भगवंताशी एकरूप होण्याचे सूत्र सांगितले गेले आहे. उत्तम श्रवण केले तरच उत्तम कीर्तन घडणार आहे. उत्तमाचे स्मरण होणार आहे. उत्तम सत्संगात राहून सद्गुरूसेवा, अर्चन घडणार आहे. नम्रभाव अंगी येऊन वंदनभक्ती साधकाकडून आपोआप घडणार आहे. या सर्व भक्ती म्हणजे परमेश्वरकडे घेऊन जाणारे टप्पे आहेत. खर्या भक्तामध्ये या सर्व टप्प्यांचा अंतर्भाव झालेला आपल्याला पहायला मिळतो.
कलियुगामध्ये या नऊभक्तिमधील नामस्मरणभक्ती वर विशेष भर दिला गेला आहे. आपल्याला मिळालेल्या मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर आजच्या काळात नामस्मरणा इतके प्रभावी साधन दुसरे कुठलेच नाही असे सर्व संत विभूतींनी वारंवार सांगितले. सर्व सामान्य जीव हा वासनेत गुरफटून स्वतःचे हित साधण्यास असमर्थ ठरतो. अशा या जीवांच्या कल्याणासाठी सर्व रोगावर नामस्मरणाचे औषध देऊन लोकांना प्रपंच आणि परमार्थ सहज कसा साधावा यादृष्टीने समर्थांनी मार्गदर्शन केले.
नामसाधना ही सर्व धर्मामध्ये, पंथांमध्ये सांगितली गेली आहे. भगवद गीतेमध्ये यज्ञानां जपयज्ञो s स्मि | सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ सर्व श्रेष्ठ मानला आहे. नामसाधना ही अशी साधना आहे जी साधकाला जन्ममृत्युच्या चक्रातून सोडवते तसेच पापांचे डोंगर नष्ट करते. भगवंताशी जोडणारी अशी ही साधना सहज आणि सुलभ असल्याचे संतांनी सांगितले. सतत सुखाच्या शोधत असणार्या माणसांना कितीही प्रयत्न केले तरी सुखापेक्षा दु:खालाच अधिक सामोरे जावे लागते. संत म्हणतात, या सर्व दु:खांचे मूळ देहबुद्धी आहे. विषय वासना, विकार, अनिश्चित आयुष्यामुळे मनात निर्माण झालेली भीती, सतत वाटणारी काळजी, चिंता, ही सर्व देहबुद्धीची लक्षणे आहेत. ती दूर होण्यासाठी देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी निर्माण होणे आवश्यक आहे. देहबुद्धी हे बद्धाचे लक्षण आहे ते जाऊन आत्मबुद्धी निर्माण होण्यासाठी नामस्मरण हे अत्यंत प्रभावी साधन होय.
सर्वसाधारणपणे भगवंताची भक्ति म्हणजे उपासतापास, व्रतवैकल्य, पोथी वाचन असाच आपला समज असतो. यामध्ये गैर काहीच नाही. आपण करत असलेल्या उपासतापास, व्रतवैकल्य, दान या साधनांच्या माध्यमातून चित्तशुद्धी होत असते. तर नामस्मरण या साधनेतून चित्तशुद्धी तर होतेच पण या साधनाच्या माध्यमातून साधकाच्या मनात प्रेमभाव निर्माण होतो. या नामसाधनेतून साधकाची देहबुद्धी नष्ट होते. वासनांचा क्षय होण्यासाठी तसेच मनावर विजय मिळवण्यासाठी नामस्मरणासारखे दुसरे प्रभावी साधन नाही. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी नामस्मरणाच्या माध्यमातून सतत भगवंताच्या अनुसंधनात राहणे, या अनुसंधानामधून सतत त्याचे सूक्ष्म चिंतन करून त्याची अखंड जाणीव ठेवणे हे सर्वोत्तम साधन आहे. मी भगवंताचा आहे हे जाणणे म्हणजे अनुसंधान पण सर्वसामान्य मनुष्य विषयांच्या इतका आहारी जातो की मी विषयांचाच आहे हा त्याला भ्रम होतो. या भ्रमातून बाहेर येण्यासाठी अखंड नामजप हे साधन अतिशय प्रभावी ठरते.
नामस्मरण म्हणजे मनाने सतत परमेश्वराचे चिंतन करून ‘मी परमेश्वराचा आहे’ त्याच अखंड स्मरण ठेवणे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘माझे प्रत्येक कर्म भगवंताच्या इच्छेने, त्याच्याच सत्तेने आणि कृपेने घडत आहे, याची अखंड आठवण असणे म्हणजे नामस्मरण’. प्रपंचामध्ये राहून आपल्याला सतत परमेश्वराचा विसर पडतो हा विसर पडू नये म्हणून नामस्मरण साधना अत्यंत महत्त्वाची आहे.
नामस्मरण हे कर्म शारीरिक नसून अंत:करण पूर्वक केलेले कर्म आहे. नामस्मरण करताना अनेकदा जपाची माळ उपासनेचे साधन म्हणून घेतली जाते यामध्ये. यातील प्रत्येक मणी आपल्याला सतत परमेश्वराचे स्मरण करून देत असतो. हे स्मरण केवळ शरीराने नाही तर मनापासून करणे अपेक्षित आहे. नाम घेताना हातामध्ये जपाची माळ फिरते आणि मन इतरत्र फिरत आहे ही अवस्था उपयोगाची नाही. कबीरांचा दोहा सर्वांना परिचित आहे
माला तो कर में फिरे, जीभी फिरे मुख्य माहीं ।
मनवा तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नहीं ॥
बहुतांशी साधकांचे मन स्मरणीचा मेरूमणी हातात येईपर्यंत कल्पना आणि विचारांमध्ये गुरफटलेले असते. आणि परमेश्वरापासून लांबच राहते. अशा नामस्मरणात राम नाही. समर्थ म्हणतात,
मना कल्पना धीट सैराट धावे | तया मानवा देव कैसेनि पावे || १०४ ||
नामस्मरण करताना परमेश्वर भेटीची तळमळ लागणे अतिशय आवश्यक आहे. विषय सुखामध्ये रमणारे हे मन जर कल्पनेच्या मागेच धावत राहिले तर मनुष्याला परमेश्वर कसा भेटणार ? त्यासाठी या साधंनेमध्ये परमेश्वर भेटीचा ध्यास महत्त्वाचा आहे. आपले प्रत्येक कर्म करताना जे घडते आहे ते सर्व परमेश्वराच्या इच्छेने घडत आहे हे स्मरण सतत ठेवणे आणि आपली सर्व कर्म त्याला अर्पण करणे हे सर्वात अवघड वर्म या साधनेचे आहे. भगवंताचे नित्य स्मरण ठेवून केलेली कर्म देखील नामस्मरणच ठरू शकतात हे अनेक संतांनी सिद्ध करून दाखवले आहे. जसे सावता माळी म्हणतात,
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी |
मिरची आणि कोथिंबीर हीच माझी पंढरी
सावता माळी यांना आपले कर्म आणि कर्मस्थान दोन्ही पंढरीच वाटतात. त्यांचे प्रत्येक कर्म त्यांचा प्रत्येक श्वास त्यांनी परमेश्वराला अर्पण केला आहे. संत चोखामेळा यांनी देखील आपले सारे जीवन परमेश्वर चिंतनातच घालवले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा नामाचा गजर ऐकू येत होता. जनाबाई सामान्य स्त्री प्रमाणे भांडण करते पण तिने थापलेल्या शेणाच्या गवर्यामधून विठ्ठलाचे नाम आपल्याला ऐकायला येत होते हे तिचे अनन्य भक्तीतून सकारलेले असामान्यत्व आहे. सर्व संत विभूतींनी आपल्या प्रत्येक कर्मामध्ये परमेश्वराचे चिंतन आणि स्मरण केलेले आहे. गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाला अनुसंधान हा शब्द योजला आहे. परमेश्वराची जवळीक साधणारी ही साधना अत्यंत प्रभावी अशी साधना आहे. त्याला स्थळ काळाच बंधन नाही. समर्थ म्हणतात,
नित्य नेम प्रात:काळी | माध्यानकाळी सायंकाळी |
नामस्मरण सर्वकाळी | करीत जावे ||
ही नाम साधना अखंड घडली पाहिजे एक पळभरही त्याचं विस्मरण होऊ नये अगदी
चालतां बोलतां धंदा करितां | खाता जेवितां सुखी होता |
नाना उपभोग भोगिता | नाम विसरो नये ||
इतके ते अंगी भिनले पाहिजे. नामस्मरणामध्ये स्मरण अत्यंत महत्वाचे आहे. ‘स्मरण देवाचें करावें | अखंड नाम जपत जावें ||’ असं समर्थ नामस्मरण भक्तीच्या प्रारंभीच सांगतात. भगवंताशी एकरूप होण्यासाठी त्याचे अखंड स्मरण, चिंतन नामजपा मधूनच घडते. या साधनेमध्ये साधक पूर्ण शरणागत असतो. समर्थांनी आपल्या आराध्यची उपासना करताना स्मरण आणि चिंतन हे दोन शब्द योजले आहेत. मनाच्या श्लोकांमध्ये ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ सांगून इथे रामाच्या गुणांचे चिंतन सांगितले आहे. उपासनामार्गामध्ये नैमित्तिक साधना महत्वाची आहे. पहाटे उठून परमात्म्याचे चिंतन ही सकारात्मक ऊर्जा दिवसभर आपल्यातील उत्साह टिकवून ठेवते. पहाटे सर्व वातावरण जसे शांत आणि प्रसन्न असते तसेच आपले मन देखील शांत आणि प्रसन्न असते. त्यामुळे या वातावरणातील भगवंताची चिंतन अधिक प्रभावी ठरते. ज्याच्या उत्तम गुणांचे चिंतन करून दिवसाला प्रारंभ करतो त्याचेच स्मरण दिवसभर साधकाला असणे अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे शून्य स्वतंत्र लिहिला तर त्या शून्याला काही किंमत नसते. त्याच्यापुढे आणखीन कितीही शून्य काढले तरी त्याला काहीच अर्थ नसतो. परंतु या शून्याच्या पाठीमागे जर एक आकडा काढला तर त्या शून्याची किंमत वाढते. हा आधीचा एक ही आपली पहाटेची साधन आहे. म्हणून केवळ उठता, बसता नाम न घेता प्रथम त्या मागची आपली साधनेची बैठक पक्की होणे आवश्यक आहे. तरच दिवसभर अखंड केलेल्या नामस्मरणाला काही प्राप्त अर्थ प्राप्त होतो. परंतु याचे महत्त्व न पटलेले आपण एकापुढे अनेक शून्य जोडत राहतो आणि या शून्य जोडलेल्या एका आकड्यातून किती अर्थप्राप्ती होते या मध्ये मन गुंतवतो. या एका पुढे कितीही शून्य लावली तरी सुद्धा या कमाईतून आपल्याला कधीही समाधान प्राप्त होत नाही. उलट लोभ आणि मोह यासारखे विकार जडत जातात. त्यामुळे या एक आकड्यापुढे साधनेचा हुकमी एक्का लावायचा आहे का एक या आकड्यापुढे अनेक शून्य लावून षडविकारांचा रोग मागे लावून घ्यायचा आहे हा विवेक आपल्या हाती आहे. अधिक अर्थप्राप्तीने मी सुखी होईन या मृगजळामागे धावता धावता जीव थकून गेला तरी त्याला थांबता येत नाही. सर्व सुखांची प्राप्ती झाली तरी अजून हवे ही त्याची लालसा कमी होत नाही. त्यामुळे मनःस्वास्थ्य हरवून बसलेला आणि दुःखाच्या महासागरात सुख शोधण्याची धडपड करत राहणारा हा जीव खऱ्या आनंदापासून कायम वंचितच राहतो. या सर्व धावपळीत त्याला भगवंताचे विस्मरण होते. या अज्ञानातून जीव मुक्त व्हावा त्याला खरे ज्ञान प्राप्त व्हावे, त्याची भौतिक व अध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी समर्थ नामाचे महत्व समजावून सांगतात.
समर्थांनी ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे’ हे सांगून सर्वांना रामनामाचा मंत्र दिला. पण हे नाम समजून करावे हे महत्वाचे सूत्र सांगायला ते विसरले नाहीत. नामसाधनेमध्ये कर्म करताना मी कर्ता यापेक्षा राम कर्ता हा भाव महत्वाचा आहे. कर्म करताना त्यामध्ये खोटेपणा करणार्यांना समर्थ म्हणतात, ‘घडे कर्म खोटें बहू तो दगा रे |’. आपली कर्म पार पाडताना त्यामध्ये प्रामाणिकपणा असावा तसे केले नाही तर कर्म करताना केलेला खोटेपणा ही परमेश्वराशी केलेली प्रतारणा ठरते. नामजपाचे सर्वात महत्वाचे सूत्र म्हणजे या साधनेत अहंकारला दूर ठेवणे. मी करतो, माझ्या कष्टमुळे मी हे साम्राज्य उभे केले हा अहंभाव माणसाचा शत्रू आहे. वेदांतानुसार अहंभाव हा प्रपंचाचे आणि परमेश्वरा विषयीच्या अज्ञानाचे कारण आहे. हा अहंभाव नष्ट होण्यासाठी कर्माचे कर्तेपण भगवंताला द्यावे. नामजप करताना सर्वाचा कर्ता करविता राम आहे हा भाव माणसाच्या वृत्ती मध्ये आमुलाग्र बदल घडवून आणतो. यासाठीच अखंड नाम जपत जावे आणि खरे समाधान प्राप्त करून घ्यावे असे समर्थांची सांगणे आहे.
या भवसागरातून तरुन जायचं असेल तर ‘सोपे सुगम हे नाम राघवाचे सर्व काळ वाचे येऊ द्यावे’. हे नामच या भवसागरातून तुम्हाला तारुन देणार आहे असं सांगून समर्थ आपल्याला सतत सावध करतात. जो सतत हे नाम श्रद्धेने घेतो त्याचा निश्चित उद्धार होतो. ‘राम नाम वाणी त्या नाही जाचणी नामे बहु प्राणी उद्धरले’ असे सांगून समर्थ आपल्या मनात विश्वास निर्माण करतात.
रामनामाने उद्धार झालेल्या वाल्या कोळ्याचे चरित्र सर्वांनाच परिचित आहे. अत्यंत निष्ठुर असणाऱ्या अशा वाल्याने निष्ठेने आणि निग्रहाने श्रीरामाचा जप केला. स्वभाव धर्मानुसार सुरूवातीला मरा मरा म्हणणार्या वाल्या कोळ्याचा उच्चार नंतर राम राम असा झाला. त्याने केलेल्या दिव्य तपाने वाल्याकोळी महर्षी पदाला जाऊन पोहोचला. इतकेच नाही तर त्याच्या हातून सर्वांच्या मनाला भुरळ घालणारे प्रभू रामचंद्रांचे चरित्र लिहिलं गेलं.
नामाचा प्रभाव इतका आहे की दैत्य कुळात जन्माला आलेला प्रल्हाद या नामाने तरला. बालपणापासूनच भगवंताच्या भक्तीत रंगलेल्या या भक्त प्रल्हादाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. दुर्दैव असे की त्याच्या पित्यानेच त्याला मारण्याचा निर्णय घेतला. परंतु नामस्मरणाच्या प्रभावामध्ये त्याने या सर्व संकटांना सहज तोंड दिले. प्रल्हादाप्रमाणेच परंतु अत्यंत पापी असा अजामेळ त्याचाही या नावाने उद्धार झाला. अजामेळ अत्यंत दूरवर्तनी असा ब्राह्मण होता. असे जरी असले तरीही कधीकाळी तो सदचारी विष्णू भक्त ब्राह्मण होता. परंतु संगतीने बिघडला होता. त्याचे सारे आयुष्य अनाचारात गेले. परंतु अंतकाळी त्यांनी जेव्हा ‘अरे नारायणा धाव’ असे आपल्या मुलाला उद्देशून म्हटले त्यावेळी अनाहूतपणे का होईना परमेश्वराचे नाव त्याच्या तोंडून निघाले. त्यामुळे त्याच्यावर आलेले मृत्यूचे संकट नाहीसे झाले. पूवीचे सदचाराचे संस्कार इतके मूळ धरून होते की त्यामुळे त्याच्या हाकेला विष्णुदूत धावून आले. अंतिम क्षणी पूर्वपुण्याई मुळे तो सर्व पापामधून मुक्त झाला आणि त्याला सद्गती मिळाली. अजामेळा प्रमाणेच आपल्या पिंजरातील पोपटाचे ‘राम’ हे नाव सतत उच्चारुन एका गणिकेचा उद्धार झाल्याची कथा पुराणात प्रसिद्ध आहे
या नामाचा महिमा प्रत्यक्ष प्रत्यक्ष शंकराला ही माहीत होता जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून जे हलाहल निर्माण झाले तेव्हा शंकराने ते विष प्राशन केले त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला म्हणून त्यांनी शितल अशा चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केले तरी त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा त्यांनी गंगेला आपल्या मस्तकावर धारण केले नागाला गळ्याभोवती गुंडाळले तरीही दहा कमी झाला नाही तेव्हा शेवटी त्यांनी रामनामाचा जप केला आणि त्याच्या प्रभावाने त्यांचा दाह शांत झाला हे राम नाम ते स्वतः आणि त्यांची पत्नी पार्वती ही सुद्धा आदराने जपते समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात जेणे जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अती आदरे गुण गातो बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नामविश्वास तेथे साक्षात भगवान शंकरांचाही श्रीराम नामाप्रती दृढ विश्वास आहे निजध्यास लागला शंकरा | शंकराला जणू त्याच्या नामाचा ध्यासच लागला. काशीला जाऊन जो देह ठेवतो त्याच्या कानात श्रीशंकर रामनाम सांगतात आणि तो मुक्त होतो असे सांगितले जाते
नामस्मरणातून भगवंताशी सख्य जोडले जाते. अत्यंत सहज आणि सुलभ वाटणारी अशी ही साधना असली तरी त्याचबरोबर आचार, विचार यांना देखील तितकेच महत्व आहे. कायिक, वाचिक, मानसिक स्तरावर भगवंताला प्रिय असेच वर्तन यामध्ये अपेक्षित आहे. एकीकडे जप करायचा आणि त्याच मुखाने इतरांची निंदा करायची हे कर्म नामजप साधनेला छेद देणारे आहे. या साधनेला नीतीची आणि सदचाराची जोड महत्त्वाची आहे. ईश्वराच्या समीप जाण्यासाठीच्या मार्गावर वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल निश्चितच साधकाच्या मार्गातील अडथळे दूर करणारा आहे. .
मानवी मन कल्पनेमध्ये रमणारे आहे. कल्पनेमध्ये रमणारे मन अनेक संकल्प करीत असते पण त्याचबरोबर संकल्पाचे रचलेले मनोरे उध्वस्त करण्याचे सामर्थ्य देखील यामध्ये असते. मनाला ज्यामध्ये रमवावे त्यामध्ये ते रमते हा मनाचा महत्वाचा गुण आहे. यासाठीच मन सतत उत्तम, सकारात्मक विचारांमध्ये रमणे आवश्यक आहे. चंचल मनाला विवेकाने आवरून ते सतत स्थिर राहण्यासाठी हे मना तू सतत राघवाचे चिंतन कर असे समर्थांचे सांगणे आहे.
मन हे अशांतीचे मूळ आहे. सदैव अस्थिर असलेल्या मनाला जर सतत सकारात्मक विचारांमध्ये रमवायचे असेल तर समर्थ या अस्थिर मनाला श्रीरामांच्या संगतीत राहण्यास सांगतात. सतत भगवंतावर प्रेम करावे, त्याला प्रिय असेल असेच वर्तन करावे असा समर्थांचा आग्रह आहे. प्रेम करणे हा माणसाचा सहज स्वभाव आहे. पण हे प्रेम करताना त्यामध्ये हा माझा तो परका हा भेद नसावा. या संकुचित विचारसरणीने केवळ दुःखच पदरी पडते. यासाठी आधी वृत्तीमध्ये बदल करून हा आपपर भाव सोडणे आवश्यक आहे. सार काय असार काय याचा विवेकाने विचार करून आपले अंतःकरण राममय करण्याचा प्रयत्न करण्यास समर्थ सांगतात. जर स्वहित साधायचे असेल तर मना सज्जना हीत माझे करावे । रघूनायका दृढ चित्ती धरावे।। मनाला रामचिंतनात राहून कल्याण साधायला समर्थ सांगतात.
मनाला जसे वळण लावावे तसे वळण त्याला लागते. म्हणून मनाला सतत रामनाम घेण्याची सवय लावावी. परमेश्वर प्राप्तीचा आनंद संतांनी अनुभवला आहे. मन जर सतत भगवंतापाशी स्थिर झाले तर ते आनंदरूप होईल हे संतांचे प्रचीतीचे बोल आहेत. पण यासाठी मनाला भगवंताच्या ठिकाणी निवास करण्याचा सराव हवा. श्रीरामांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या समर्थांनी त्रयोदशाक्षरी मंत्राचे पुरश्चरण केले आणि आपल्या शिष्यांना देखील हाच मंत्र दिला.
तुला सांगतो गूज हा बीजमंत्रू । जेणे निरसे थोर संसार शत्रू ।।
नव्हे मिथ्य हे बोलणे सत्य वाचा । जप अंतरी मंत्र तेराक्षराचा ।।
हा त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणताना राम माझा स्वामी आहे, माझा रक्षणकर्ता आहे अशी साधकाची निष्ठा असणे आवश्यक आहे. सर्व दु:खातून मुक्त करणारा असा हा रामनामाचा जप आहे. रामनाम ही अशी अपार, अद्भुत शक्ती आहे की जीवनातील सर्व कष्टांचे निवारण त्याने होते. श्रीराम माझा रक्षणकर्ता आहे, सतत माझ्या हृदयात वास करत आहेत अशी समर्थांची नितांत श्रद्धा होती.
भगवंताच्या समीप जाण्याचे उपासना एक साधन आहे. उपासना म्हणजे अंतरंग शुद्धीचे बाह्य आचरण. मनापासून केलेल्या उपासनेतून अनेक फायदे होतात. उपासनेमुळे विकार नष्ट होतात. वृत्ती शांत होते. उत्तम स्पंदने निर्माण होतात. आचरण सुधारते ,शुद्ध होते. सत्वगुण वाढीस लागतो. सतत उत्तम विचारांच्या आघातांनी काम, क्रोध, या विकारांवर संयम येतो. कितीही उपभोग घेतला, हव्यास ठेवला, प्रसंगी क्रोध अनावर झाला तरी या सर्वाचा काही उपयोग नाही हे खूप काळ गेल्यानंतर अनुभवाने पटते. पण नित्य उपासनेने याची सतत जाणीव होत राहते. देहबुद्धी नष्ट होऊन भगवंता विषयी प्रेम वाढीस लागते. अशा अनेक सकारात्मक गोष्टी एका उपासनेच्या माध्यमातून घडतात म्हणून समर्थ मनाला सतत राघवाच्या संगतीत राहण्याचा आग्रह धरतात. त्याच्या शिवाय आयुष्यामध्ये व्यतीत केलेले क्षण म्हणजे स्वतःची हानी करून घेण्यासारखे आहे. समर्थ वारंवार श्रवण, चिंतन, मनन आणि निजिध्यास याचे महत्व स्पष्ट करतात. आपण ज्याचे चिंतन मनन करतो हे चित्तात खोलवर रुजते. म्हणून सतत भगवंताचे चिंतन मनन करून नामाच्या माध्यमातून नित्य त्याच्या समीप रहा हे समर्थांचे सांगणे आहे.
चित्तशुद्धी करून निःश्रेयसकडे वाटचाल करणे हे मानवी जीवनाचे ध्येय असावे. धर्म आणि सदाचाराचे पालन करून जीवनाचे अंतिम ध्येय जे मोक्ष ते प्राप्त करणे यातच मानवी जीवांची सफलता आहे. या उद्देश प्राप्तीसाठी समर्थांचा हा ग्रंथ पूर्णपणे सहाय्यक ठरतो. आजच्या काळात माणसांची ईश्वरावर श्रद्धा राहिलेली नाही. धर्माचे व्यापारीकरण झाले आहे. नकारात्मक विचारांच्या व्यक्ती कशा श्रेष्ठ आहेत हे पटवून देण्यात स्वारस्य वाटते आहे. चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले म्हणण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात लोकांना धन्यता वाटत आहे. अशा या परिस्थितीमध्ये कोणत्याही दैवताची पूजा, उपासना लोकांना अवास्तव आणि अस्वीकार्य वाटेल. वास्तविक या अध्यात्म शस्त्राने आपल्याला जी व्यापक शिकवण दिली त्यानुसार या विश्वाचा जो पसारा आहे त्या विश्वाचा मी एक घटक आहे आणि त्या विश्वाचे जे नियम आहेत त्याचे मी पालन करणे ही माझी जबाबदारी आहे. या विश्वाच्या निर्मात्याची जाणीव ठेवणे हे माझे कर्तव्य आहे याचे भान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. नामाच्या या दिव्य नौकेत बसून आपण निश्चित आनंदमयी जीवन जगण्यात यशस्वी होऊ यात कोणतीच शंका नाही
नाम स्मरे निरंतर | तें जाणावें पुण्यशरीर |
माहां दोषांचे गिरिवर | रामनामें नासती ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
Saturday, April 26, 2025
‘षड्रिपु’ ! मनाचे हॅकर्स
|| श्रीराम ||
षड्रिपु मनात लपलेले सहा हॅकर्स...........
Tuesday, April 15, 2025
रामायणातील आदर्श पुरुष व्यक्तिरेखा
|| श्रीराम ||
|| श्रीराम ||
रामायणातील आदर्श पुरुष व्यक्तिरेखा
डॉ. सौ माधवी महाजन
प्राचीन साहित्यामधील रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये जनमानसावर खोलवर परिणाम करणारी ठरली. या महाकाव्यांमधून यशस्वी मानवी जीवनासाठी अनेक आदर्श समोर ठेवले गेले. महर्षि वाल्मिकी लिखित रामायण या महाकाव्यातील सकारात्मक व्यक्तिरेखा आपल्याला अनेक जीवनमूल्ये शिकवून जातात. प्रेम, संयम, सदाचार, सत्य, आदर, शौर्य, पराक्रम, त्याग, निरपेक्ष भक्ती, अन्यायाला प्रतिकार, नातेसंबंध, आज्ञाधारकता, अशा अनेक गुणांचे दर्शन या महाकाव्यात आपल्याला घडते. असत्यावर सत्याचा विजय, सकारात्मक विचारांचा विजय याचे दर्शन घडवणारी ही गाथा आहे. आजही नायकाने खलनायकाचा केलेला पराभव पहायला आपल्याला नक्कीच आवडते. खल वृत्तीचा झालेला नाश पाहून एका आनंदाचा अनुभव आपण घेतो. हाच आनंद या महाकाव्यातून आपल्याला मिळतो.
वाल्मिकी रामायणाचे विशेष म्हणजे व्यक्तीचे आयुष्य नियंत्रित राहण्यासाठी, कौटुंबिक स्वास्थ्य स्थिर राहण्यासाठी, समाजाचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी, समृद्ध जीवनासाठी रामकथा आदर्श ठरते. रामायणातील व्यक्तिरेखा उदात्त आणि समाजासमोर आजही आदर्श निर्माण करणार्या आहेत. राम आदर्श पुत्र त्याचबरोबर आदर्श राजा देखील आहे, सीता आदर्श पत्नी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आदर्श बंधु, हनुमान आदर्श भक्त. अशी या व्यक्तिरेखांची यादी बरीच मोठी आहे. या सर्व व्यक्तिरेखा इतका उच्च कोटीतला आदर्श समोर ठेवतात की सामान्य माणसे त्यांना देवत्व बहाल करतात. असे होऊ नये यासाठीच महर्षींनी या सर्वांच्या मानवी गुणांचे वर्णन केले आहे. आपण त्याचे अनुकरण करून आपले जीवन उज्ज्वल करावे यासाठी महर्षींनी हे आदर्श आपल्या समोर ठेवले आहेत. त्या गुणांचे चिंतन आणि आचरण केले तर मानवी जीवन नक्कीच समृद्ध आणि यशस्वी होईल याची खात्री वाटते.
रामायणातील आदर्श पुरुष कोण तर ईश्वकू कुळात जन्माला आलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याविषयी सर्वांचे एकमत आहे. याशिवाय श्रीरामांच्या अनुषंगाने अनेक आदर्श व्यक्तींचे दर्शन या महाकाव्यातून घडते. श्रीरामांच्या रघुवंशाचा विचार केला तर या वंशातील राजे पराक्रमी आहेत. गड्गंज संपत्तीचे अधिकारी असले तरीही उपभोग शून्य आहेत. कालिदास म्हणतो त्याप्रमाणे अयोध्यानगरीमध्ये राज्य करणारा अत्यंत श्रेष्ठ असा हा सूर्यवंश आहे. जो स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबापेक्षा प्रामुख्याने प्रजेचा अधिक विचार करणारा आहे. कुटुंबाचा विचार न करता प्रजेला महत्व देऊन त्यांचे हीत, त्यांचे सुख बघणार्या राजांनी त्या त्या वेळी योग्य निर्णय घेतलेले पहाला मिळतात. यामध्ये राजा हरिश्चंद्र, दिलीप, रघु, अज, दशरथ, श्रीराम आणि त्यांचे बंधु या सर्वांनी आपल्या वर्तनातून समजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सत्यवचनी राजा हरिश्चंद्र स्वप्नामध्ये दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपले राज्य, सर्व संपत्ति विश्वामित्राना अर्पण करतो. तसेच त्यांना अधिक दक्षिणा देण्यासाठी पैशांची तरतूद व्हावी म्हणून चांडाळाकडे देखील काम करतो. त्याच्या या संघर्षामध्ये राणी तारामती आणि त्याचा छोटा मुलगा रोहित हे देखील सहभागी होतात. सत्यवचन म्हणजे नेमके काय याची प्रचिती या कथेतून येते. दिलेला शब्द पाळणे मग तो जागेपणी दिलेला असो वा स्वप्नातील असो, त्याची पूर्तता करण्यासाठी राजा हरिश्चंद्राने केलेला संघर्ष आणि त्याच्या कुटुंबाने या काळात त्याला दिलेली साथ यागोष्टी खूप काही शिकवून जातात. मी राजा आहे किंवा राणी आहे म्हणून कोणी राजमहालात आराम केला नाही किंवा त्याचा उपभोग घेतला नाही. आठ वर्षाच्या रोहितला देखील या सर्व संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. राजा म्हणून उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर कसा आणि किती करायचा हा विवेक रघुवंशातील राजांकडे होता.
रघुवंशाचे वैशिष्ठ्य हे की दान देण्यासाठी आणि प्रजेच्या सुखासाठी ते धन गोळा करतात, स्वतःच्या सुखासाठी धनाचा उपयोग करत नाहीत. सत्यवचनी, मितभाषी असे हे राजे कीर्तिसाठी विजयाची इच्छा बाळगतात. विवाह करतात पण संततीसाठी, योग्य वयात शिक्षण घेतात, तारुण्यात प्रमाणात ऐहिक सुखाचा उपभोग घेतात आणि म्हातारपणात ऋषितुल्य जीवन जगतात. शरीराचा त्याग करताना कोणतेही क्लेश त्यांना होत नाहीत.
राजा दिलीप आणि सुदक्षिणा यांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न, त्यातून घडलेली नंदिनीची सेवा, त्याचे गुरुप्रेम आणि निष्ठा या सर्व गुणांचे दर्शन घडते. याच दांपत्याला प्राप्त झालेला पुत्र म्हणजे रघु. ज्याच्या नावाने श्रीरामाचा वंश ओळखला जाऊ लागला. अत्यंत पराक्रमी असणार्या रघुचे वैशिष्ठ्य हे की तो दर पाच वर्षानी विश्वजित यज्ञ करून आपली सारी संपत्ति दान करून टाकत असे. या यज्ञात स्वतःच्या वैयक्तिक संपतीचे दान केले जात होते. रघुवंशात पैशांचा घोटाळा होत नसे किंवा घरामध्ये संपत्ति दडवून ठेवली आहे असे प्रकार घडत नसत. सर्वाचे दान केले जात असे. उपभोगशून्य म्हणजे काय ते रघुराजाचे चरित्र बघितले की समजते. दारी आलेल्या याचकला विन्मुख न पाठवणार्या या राजाकडे जेव्हा विश्वजित यज्ञ झाल्यावर कौत्स्य काही अपेक्षा घेऊन येतो तेव्हा रघु त्याला निराश करत नाही. आपल्या गुरूंच्या आश्रमाला चौदा करोड सुवर्णमुद्रा देण्यासाठी कौत्स्यला रघुची मदत हवी असते. यासाठी रघु कुबेरावर चाल करून जाण्याचे ठरवतो. पण रघुचा पराक्रम माहिती असलेला कुबेर रघु चालून येण्याच्या आधीच त्याच्या महालावर मोहोरांची बरसात करतो. याशिवाय अजून धन हवे असेल तर पाठवतो असा निरोपही सेवका करवी पाठवतो. चौदा करोडपेक्षा अधिक धन रघुला प्राप्त झाले होते पण त्याने ते सर्व धन कौत्स्याला घेऊन जाण्यास सांगितले. परंतु कौत्स्याने त्याला हवे तेव्हढेच धन घेतले. रघुने उरलेले सर्व धन स्वतःच्या तिजोरीत न भरता त्याचा विनियोग प्रजेच्या हितासाठी केला. रघुवंशातील राजांची चरित्रे बघितली तर अनेक उत्तम गुणांनी मंडित असे हे राजे आहेत. राजा हरिश्चद्राची सत्यनिष्ठा बघितली, दिलीप राजाची गुरुनिष्ठा वाखणण्याजोगी होती त्याचबरोबर गोमातेविषयीच्या प्रेमाचे दर्शन घडते. रघुराजाचा पराक्रम आणि त्याची दानशीलता याचा प्रत्यय त्याच्या चरित्रातून येतो. या सर्वांच्या चरित्रातील कथा काल्पनिक आहेत असाच दावा आजकाल करण्यात येतो. कारण इतक्या उच्च प्रतीचे आदर्श आज पहाला मिळत नाहीत.
राजा रघुचा मुलगा अज अत्यंत पराक्रमी होता. अज आणि त्याची पत्नी इंदुमती यांच्या पोटी महाराज दशरथांचा जन्म झाला. ज्याने पुढे जाऊन पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला ज्याचे फळ म्हणजे त्यांना चार पुत्रांची प्राप्ती झाली. श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशा दिव्य पुत्रांचा जन्म या रघुवंशात झाला. कौशल्येच्या श्रीरामाचे चरित्र अनुकरणीय आहे ते त्याच्या वर्तनामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये असणार्या अनेक गुणांमुळे. श्रीराम जे बोलले तसेच वागले आणि ते मानव धर्मात करता येते हे त्यांनी दाखवून दिले. म्हणून त्यांचे अनुसरण करणे मानवी जीवनात शक्य आहे. सत्यवचन हा रघुवंशाचा गुणविशेष श्रीरामचंद्रांमध्ये उतरला आहे. स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करणाऱ्या हरिश्चंद्राच्या वंशातील श्रीरामचंद्र आपल्या वडिलांचे शब्द खोटे ठरू नयेत यासाठी प्रयत्नवादी आहेत. ज्यादिवशी श्रीरामांना राज्याभिषेक होणार त्याच दिवशी त्यांना वल्कले नेसून चौदा वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. परस्पर विरोधी अशा दोन घटना आहेत पण श्रीरामचंद्रांनी राज्याभिषेक जेवढा सहज स्वीकारला तेवढ्याच सहजतेने वनवास देखील स्वीकारला. वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चरित्राला असत्याचा कलंक लागू नये म्हणून श्रीरामांनी एक तप म्हणून वनवास स्वीकारला. स्थितप्रज्ञ हा त्यांच्यातील गुण वाखाणण्या जोगा आहे. श्रीराम आनंदाने बेभान होत नाहीत का दु:ख झाले म्हणून खचून जात नाहीत.कोणत्याही प्रसंगात शांत राहण्याची त्याची वृत्ती आहे. स्वतःच्या बळावर राज्य हिसकावून घेण्याची त्यांची वृत्ती नाही. त्यांना कशाचाच लोभ नाही. अधाशीपणा, वखवख या दुर्गुणांना त्यांच्या ठिकाणी थारा नाही. अत्यंत समाधानी, पूर्ण संयमी असे हे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनाला भुरळ घालणारे आहे.
शबरीचे प्रेम बघून, प्रेम भावनेने तिची उष्टी बोरे खाणारा, अहिल्येचा उद्धार करणारा, कैकयीचे अपराध पोटात घालून तिच्यातील चांगले गुण पहा, असे भरताला सांगणारा श्रीराम. हे त्याचे प्रेम करणे, दुसर्याचे अपराध पोटात घालणे म्हणजे क्षमाशील असणे हे आपण आपल्या आचरणात आणू शकतो. जो परित्राणाय साधूनां हा विचार करून यज्ञ कार्यात येणारी विघ्ने आपल्या शक्ती बुद्धीच्या बलाने दूर करतो. पण त्याचबरोबर लोकांच्या मनातील वैर भाव दूर करतो मग ती वाली पत्नी असो, बिभीषण असो. अगदी रावणाबद्दल क्रोध बाळगणारा लक्ष्मण असो. म्हणजे वैरभाव कायम मनात न बाळगता कुठे थांबायच हे ज्याला कळलं असे श्रीराम अशा श्रीरामाचे गुण आचरणीय आहेत. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी अशा श्रीरामचंद्रांनी आपल्या वागण्या, बोलण्यातून, एक आदर्श निर्माण केला. नरदेहप्राप्ती नंतर आपल्यामधील दैवी गुणांच्या साहाय्याने मनुष्य कसे उच्च कोटीतील आदर्श जीवन जगू शकतो हे रामचंद्रांच्या चरित्रातून पाहायला मिळते.
श्रीरामचंद्र एक आदर्श पुत्र, आदर्श बंधू, राज्यधर्माचे पालन करणारा, आदर्श राजा असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. श्रीरामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. रामराज्यामध्ये जनहितार्थ या शब्दाला तेव्हाचे राजे प्रामाणिक होते. कुटुंबाला, स्वहिताला दुय्यम स्थान देऊन जनतेचे कल्याण हे महत्वाचे मानले जात होते. प्रजेने जेव्हा सीतेविषयी संशय व्यक्त केला तेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता प्रजेसाठी, राजधर्माचे पालन करण्यासाठी आपल्या धर्मपत्नीचा त्यांनी त्याग केला. श्रीरामांनी धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या आहेत म्हणूनच मर्यादापुरुषोत्तम असा त्यांचा गौरव केला जातो.
श्रीरामप्रमाणेच त्यांचे सर्व बंधूंचा आदर्श घ्यावा असेच त्यांचे आचरण दिसते. श्रीरामा पाठोपाठ येते ते भरताचे चरित्र. रामावर उत्कट प्रेम असणारा भरत तत्वनिष्ठ आहे. गोस्वामी तुलसीदासांनी भरताचे वर्णन करताना एक सुंदर उपमा दिली आहे. यानुसार भरतामध्ये हंसत्व आणि चातकत्व हे दोन्ही एकत्र पहायला मिळते. हंस हे विवेकाचे तर चातक प्रेमाचे प्रतीक आहे. या दोन्हीचा मिलाफ भरताच्या चरित्रामध्ये पहायला मिळतो. श्रीरामाला राज्याभिषेक करण्याचे ठरले आणि लगेच दुसर्या दिवशी त्याला वनात जावे लागले. मंथरेच्या संगतीमुळे बिघडलेल्या कैकयीने रचलेल्या षडयंत्राविषयी भरत पूर्णपणे अनभिज्ञ होता. आयोध्येमध्ये आल्यानंतर त्याला जेव्हा रामाला बाबांनी वनात धाडले आहे हे समजले तेव्हा त्याची प्रतिक्रिया फार वेगळी होती. वडिलांच्या मृत्युची बातमी ऐकल्यावर कोसळून पडणारा भरत दादाच्या वनवास गमनाची वार्ता ऐकून एकदम गंभीर झाला आहे. त्याचे त्याच्या दादावर अतोनात प्रेम आहे पण त्याच वेळी त्याचा विवेक देखील जागा आहे. दादाला शिक्षा झाली म्हणजे दादा कडून काही अपराध घडला असावा असे वाटून तो काही प्रश्न विचारतो ज्यातून त्यावेळी कोणत्या अपराधला असे कठोर शासन होते हे लक्षात येते. भरताने विचारले , “दादा वनात गेला म्हणजे त्याने काही अपराध केला का? दादाने एखाद्या ब्राह्मणाचा वध केला का? त्याने एखाद्या गरिबाचे धन लुबाडले का? एखाद्या स्त्रीवर अत्याचार केला आहे का? त्याच्या हातून गोहत्या घडली का? “ दादा यातील कोणताच गुन्हा करणार नाही याची त्याला खात्री आहे. पण आयोध्येचा राजा ज्याअर्थी भावी युवराजाला वनात पाठवतो याचा अर्थ त्याच्या हातून असाच काही गंभीर अपराध घडला असावा असा त्याचा समज झाला. रघुवंशाची कीर्तिपताका असणारा दादा हे असे काही करणार नाही याची पण त्याला खात्री होती. श्रीरामाचे चारित्र्य असे आहे की कैकयी देखील भरताला ओरडून म्हणते की तू रामावर असे आरोप कसे करू शकतोस. श्रीरामकडून असे काही घडणार नाही याची सर्वांनाच खात्री आहे. प्रत्यक्षात आपल्या आईमुळे आयोध्येवर हे संकट आले आहे आणि आपण रामाला वनात पाठवण्याचे कारण ठरलो आहोत हे त्याला समजल्यावर भरताला अतोनात दु:ख झाले आहे. त्यानंतर त्याने कैकयी मातेच्या महालात प्रवेश केलेला नाही. पण भरताचा विशेष हा की तो मर्यादा सोडून देखील वागला नाही. मंथरा या सर्वाच्या मागे आहे हे समजल्यावर देखील भरताने अत्यंत संयमाने सर्व परिस्थिति हाताळली आहे. कारण असे संयम सोडून वागलेले दादाला आवडणार नाही याची त्याला जाणीव आहे.
कोणत्याही कारणाने का होईना आयोध्येचे राज्य भरताला मिळाले होते पण रघुवंशातील भरताला राज्याचा मोह नाही. श्रीरामाला वनातून घेऊन यायचे आणि त्याला पुन्हा राज्यावर बसवायचे हे ठरवून तो रामाला आणायला वनात गेला. तिथे मोठे चर्चासत्र घडले आहे. भरताची तीव्र बुद्धिमत्ता याप्रसंगातून दिसून येते. श्रीरामला आयोध्येला घेऊन जायचेच हा निश्चय करून आलेल्या भरताला श्रीरामसमोर माघार घ्यावी लागली. श्रीरामांच्या पादुका घेऊन भरताला आयोध्येत परतावे लागले. भरताचा विशेष हा की त्याने हे चौदा वर्षाचे राज्य स्वामी म्हणून स्वीकारलेले नाही तर सेवक म्हणून स्वीकारले. चौदा वर्षे भरताने श्रीरामाप्रमाणे कुटीमध्ये आपले वास्तव्य ठेवले. श्रीरामांप्रमाणे त्याने वल्कले धारण केली. केवळ चौदा वर्षासाठी त्याने दादाचे राज्य सांभाळण्याची तयारी दर्शवली. नंदिग्राममध्ये चौदावर्षे जटाभार, वल्कले धारण करून कंदमुळे खाऊन त्याने आपले जीवन व्यतीत केले. धन्य तो भरत, धन्य त्याचे बंधुप्रेम आणि धन्य त्याची तत्वनिष्ठा. साक्षात वासिष्ठांनी भरताचे कौतुक केले. ते म्हणतात, “अरे भरता तुझ्या आचरणा वरुन यापुढे शास्त्राची रचना होईल. लोक शास्त्रानुकूल वर्तन करतात पण काही लोकांचे जीवन बघून शास्त्राची रचना होते. भरता एकवेळ शास्त्राची चूक होईल पण तुझ्याकडून होणार नाही” या शब्दात त्यांनी भरताचा गौरव केला आहे. चौदावर्ष राजलक्ष्मीच्या सहवासात राहून भरताने त्याचा उपभोग घेतला नाही. श्रीरामबरोबर आयोध्येत राहून त्याने वनवासी जीवन जगले. भरताचे चरित्र म्हणजे एक अनुपम आदर्श आपल्यापुढे महर्षींनी ठेवला आहे.
रामायणामध्ये अजून एक अलौकिक व्यक्तिमत्व पहाला मिळते जे संपूर्ण राममय आहे ते म्हणजे लक्ष्मणाचे. राम म्हंटले की लक्ष्मण हा उच्चार येतोच. लक्ष्मणाने आपल्या जीवनात श्रीरामाशिवाय इतर कशाचेच चिंतन केले नाही. एखाद्या सावली प्रमाणे तो सतत श्रीरामाबरोबर राहिला. श्रीराम वनात निघाले तेव्हा कशाची पर्वा न करता लक्ष्मण त्याच्याबरोबर वनात निघाला आहे. श्रीरामाने त्याला आईची अनुमती घेऊन ये असे सांगितल्यावर तूच माझी माता आणि तूच माझा पिता असे सांगून त्यांच्या बरोबर वल्कले नेसून निघाला आहे. त्याची पत्नी उर्मिला हिला केवळ “मी निघालो आहे” इतकेच सांगून तिचा निरोप घेतला आहे. श्रीरामापुढे त्याने आपल्या पती कर्तव्याचा देखील विचार केला नाही. स्वतः पुरता विचार करणार्या संकुचित विचारसरणीच्या लोकांना हा उदात्त भाव समजणे कठीण आहे.
दादाचा जो मित्र तो माझा मित्र, दादाचा जो शत्रू तो माझा शत्रू मग तो कोणीही असो हाच त्याचा भाव आहे. श्रीरामाला वडिलांमुळे वनात जावे लागते आहे हे लक्ष्मणाला समजल्यावर त्याने त्यांची देखील पर्वा केली नाही. उग्रप्रवृतिच्या लक्ष्मणाने बाबांना तुरुंगात टाका, वेळ पडली तर त्यांना प्राणदंड द्या पण राजसिंहासनावर श्रीरामानेच बसले पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. कारण ही आज्ञा रघुकुळाला शोभणारी नाही. या निर्णयामुळे राजगादीच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे म्हणून बाबांना कैद केले पाहिजे अशी त्याची धरण आहे. लक्ष्मण आक्रमक आहेत तितकेच रामचंद्रांविषयी हळवे आहेत. लक्ष्मण अतिशय बुद्धीमान आहे. त्याने श्रीरामाला बाबांना का कैद करावे हे सिद्ध करून दाखवले आहे. पण श्रीरामाने जेव्हा संगितले की असे करणे योग्य नाही तेव्हा त्याने लगेच हा विषय बंद केला आहे. लक्ष्मण आत्मसमर्पित जीवन जगाला आहे.
विश्वामित्रांनी यज्ञ संरक्षणासाठी महाराज दशरथांकडे श्रीरामाची मागणी केली तेव्हा देखील लक्ष्मण रामबरोबर आहे. श्रीरामाला बोलवले म्हणजे लक्ष्मण येणारच इतकी सहजता त्यामध्ये होती. अत्यंत पराक्रमी अशा लक्ष्मणाने श्रीरामाबरोबर अनेक राक्षसांचा संहार केला आहे. राम रावण युद्धामध्ये अजिंक्य असणार्या इंद्रजीतचा पराभव लक्ष्मणाने केला आहे. इतकेच नाही तर त्याचा वध देखील केला आहे.
लक्ष्मण कितीही तापट असला तरीही चूक असेल तर लगेच माफी मागण्याची त्याची तयारी देखील आहे. सुग्रीवाने भगवती सीतेच्या शोधासाठी सहकार्य करण्याचे वचन दिल्या नंतर चार महीने काहीच केले नाही. तेव्हा संतापून लक्ष्मण त्याला जाब विचारायला जातो. त्यावेळी शोधकार्यासाठी माणसे पाठवली आहेत हे समजल्यावर त्याने त्याची लगेच माफी मागितली आहे. स्वतःची चूक लक्षात आल्यानंतर लगेच माफी मागण्याचे औदार्य त्याच्याकडे आहे. लक्ष्मणाचे किती गुण वर्णावेत तेव्हढे कमी आहेत. चारित्र्याच्या बाबतीत लक्ष्मण अत्यंत श्रेष्ठ होता. जेव्हा भगवती सीतेचे दागिने ओळखण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यामधील अलंकार बघून त्यातील पैंजणे वहिनीची आहेत हे तो लगेच ओळखतो. कारण वहिनीला रोज वंदन करताना त्याला त्या पैंजणाचे दर्शन घडत होते. याविषयीचा त्याचा श्लोक प्रसिद्ध आहे,
नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्।
इतर दागिन्यांकडे त्याने कधी निरखून बघितलेच नव्हते. त्यामुळे त्याविषयी तो काहीच स्पष्ट सांगू शकला नाही. अतिशय संयमित असे जीवन लक्ष्मण जगला आहे.
अत्यंत पराक्रमी, बेधडक लक्ष्मण रामामध्ये पूर्णपणे एकरूप झाला आहे. दास्यभक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून लक्ष्मणाकडे पहाता येते. दादा म्हणेल ते प्रमाण मानणारा लक्ष्मण अनेक प्रसंगामध्ये त्याला दादाचा देखील एखादा निर्णय मान्य नसला तरी दादाने सांगितले त्या आज्ञेचे त्याने निमूटपणे पालन केले आहे. त्याला महाराज दशरथांचा निर्णय मान्य नव्हता तरी श्रीरामाने सांगितल्यावर लक्ष्मण शांत झाला आहे. सीता त्यागाच्या प्रसंगामध्ये देखील लक्ष्मणाला हा निर्णय मान्य नाही पण तरीही हे कठोर कार्य त्याला पार पाडावे लागले आहे. भगवती सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यावेळी लागणारी काष्ठे श्रीरामाने लक्ष्मणाला आणायला सांगितली. खरंतर लक्ष्मणाला हे मान्य नाही. पण श्रीरामाचा अंतिम निर्णय जरी त्याला मान्य नसला तरी त्याचे पालन करणे हा लक्ष्मणाचा स्वभाव आहे. मला पटले तरच मी करेन हा बौद्धिक अहंकार त्याच्यामध्ये नाही. लक्ष्मणाचे जीवन रामाला समर्पित आहे.
श्रीरामांचे देखील लक्ष्मणावर तितकेच प्रेम आहे. लक्ष्मणाला रामाचा बहिश्चर प्राण म्हंटले जाते. रामायणाच्या शेवटी याचा आपल्याला प्रत्यय येतो. श्रीरामाना विरहाचे दु:ख आहे. त्यांना आपल्या मातापित्यांचा विरह सहन करावा लागला, पत्नीचा वियोग सहन करावा लागला, भरताचा वियोग सहन करावा लागला, इतकच नाही तर भरत भेटीच्या वेळी क्षणभर का होईना त्यांच्यापासून त्यांचे प्रिय कोदंड देखील दूर झाले होते हे सगळे विरह श्रीरामाने सहन केले पण एकच विरह त्यांना सहन झाला नाही तो म्हणजे लक्ष्मणाचा. रामकथेच्या शेवटच्या सर्गामध्ये लक्ष्मणाकडून नियमभंग झाल्यामुळे धर्मानुसार कर्तव्यनिष्ठ राजा रामाला आपल्या प्राणप्रिय भावाला प्राणदंडाची शिक्षा द्यावी लागली. खरे तर जे घडले त्यामध्ये लक्ष्मणाची चूक नव्हती पण आयोध्या वाचावी म्हणून लक्ष्मणाने जाणीवपूर्वक चूक केली आहे. श्रीरामांना वंदन करून त्यांच्या शेवटच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी लक्ष्मण शरयू नदीत प्रवेश करण्यासाठी निघून गेला. चूक घडली तर स्वतः शिक्षा ग्रहण करणारे महापुरुष या वंशात आहेत. लक्ष्मणाला शिक्षा देऊन राजाचे कर्तव्य श्रीरामांनी पार पडले पण रामाशिवाय लक्ष्मण आणि लक्ष्मणाशिवाय राम कधीच राहिले नाहीत. राजा म्हणून श्रीरामांनी धर्माचे आणि कर्तव्याचे पालन केले पण आपल्या भावाशिवाय श्रीराम एक क्षण राहू शकत नाही. लक्ष्मणा पाठोपाठ श्रीरामानी शरयू नदीत प्रवेश केला. श्रीरामांना रघुवंशाची किर्तिपताका म्हंटले जाते तर लक्ष्मणाला त्या ध्वजाचा ध्वजदंड म्हंटले जाते. लक्ष्मणाने प्रेमाने श्रीरामला जिंकले होते. म्हणूनच श्रीराम लक्ष्मणाचा वियोग सहन करू शकत नाहीत. अत्यंत तेजस्वी असे हे चरित्र पुन्हा पुन्हा जाणून घ्यावे असे आहे.
रामायणातील आदर्श पुरुषांचा वेध घेताना रघुवंशातील शत्रुघ्नाला विसरून चालत नाही. सुमित्रेचे लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोन अलौकिक पुत्र. एकाने आपले सारे जीवन श्रीरामाला अर्पण केले तर दुसर्याने भरताची पाठ सोडली नाही. अशा जोड्या असल्या तरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम अभेद्य होते. त्यांचे नाते एकमेकांवरचे प्रेम आणि त्यागवृत्ती यामुळे अधिक दृढ होते. त्यांची एकी, एकमेकांविषयीचा आदर, त्यांचे बंधुप्रेम आजही आपल्याला आदर्श ठरते. शत्रुघ्नाचा उल्लेख रामायणात जास्त येत नसला तरी ज्यातून त्याचे दर्शन घडते ते नक्कीच आदर्श ठरणारे आहे. पराक्रमी शत्रुघ्नाने अत्यंत क्रूर अशा लवणासूरचा पराभव केला इतकेच नाही तर त्याचा वध केला आणि मथुरेत स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. मुळात शत्रुघ्न या नावातच त्याचा पराक्रम दडला आहे.
शत्रुघ्न म्हणजे ज्याच्या नुसत्या स्मरणाने शत्रू मरतात. भक्तीच्या वाटेवरून गेले तर आपला प्रमुख शत्रू कोण तर अहंकार. मी केले असा भाव ज्याच्या मनाला स्पर्श करत नाही असा हा शत्रुघ्न. रामकथेत कुठेही व्यक्त होताना दिसत नसला तरी अव्यक्त अशी ही व्यक्तिरेखा अनेक जबाबदार्या पार पाडताना दिसते. आयोध्येवर मोठे संकट आले आहे. महाराज दशरथांचा मृत्यू झाला आहे, दोन भाऊ चौदा वर्षासाठी वनात गेले आहेत. भारताने राज्याचा त्याग करून नंदिग्राम मध्ये त्याचे वास्तव्य आहे. चौदा वर्ष आयोध्येला राजा नाही. अशा परिस्थितीत राज्यात अराजक माजू शकते, शत्रू चाल करून येऊ शकतो. मग या परिस्थितीत या सर्वांवर नियंत्रण कोणी ठेवले? घरातील सर्व स्त्रिया आपआपल्या परीने दु:खी आहेत त्यांना कोणी सावरले? असे अनेक प्रश्न उभे राहतात. या चौदा वर्षात या सर्व जबाबदर्या शत्रुघ्नाने पार पडल्या आहेत. या कालावधीत राज्य बळकवण्याचे क्षुद्र विचार त्याच्या मनात आलेले नाहीत. चारी भावांनी हा वनवास एक व्रत म्हणून स्वीकारले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी चौघेही वनवासातच आहेत. राजवैभवात राहून संन्यस्त जीवन जगणारा हा योगी ‘मी केले म्हणून झाले’ असे कुठेही मिरवताना दिसत नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा व्यर्थ अहंकार बाळगणार्यांनी शत्रुघ्नाच्या चरित्राचे जरूर चिंतन करावे.
रामायणकाळामध्ये राजसत्तेपेक्षा ऋषिसत्ता अधिक प्रबळ होती. ऋषींच्या आज्ञेशिवाय राजा कोणतेही निर्णय घेत नसे. ईश्वकू वंशाचे गुरु महर्षि वसिष्ठ, श्रीरामांना ज्यांनी घडवले ते महर्षि विश्वामित्र, यांची भव्यदिव्य चरित्र रामकथेत पहायला मिळतात. या ऋषितुल्य तपस्वींचे जीवन देखील आपल्या समोर एक आदर्श ठेवून जातात. महर्षि वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी महाराज दशरथांच्या युवराजांना घडवले आहे. श्रीरामच्या वनवासपर्वामध्ये अनेक ऋषींचे सहकार्य त्यांना लाभले. महर्षि अगस्तीनी श्रीरामाला रावण वधासाठी ब्रह्मशर बाण देऊन सहकार्य केले होते. या ऋषींप्रमाणेच श्रीरामाने जे संघटन केले त्यामध्ये नर, वानर, अस्वल याशिवाय जटायु, सांपाती या पक्षांनी देखील श्रीरामाला सहकार्य केलेले दिसते.
प्रभू रामचंद्रांनी धर्मस्थापनेसाठी या सर्वांच्या सहाय्याने जो पराक्रम गाजवला त्यामध्ये हनुमंताचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. भगवती सीताच्या शोधकार्यात हनुमंताची सर्वात महत्वाची भूमिका आहे. समाजामध्ये काही सकारात्मक कार्य करावयाचे असेल तर ध्येयनिष्ठ, आपल्या ध्येयाशी अत्यंत प्रामाणिक, कार्यात सातत्य राखणारे, निष्ठावान, अशा अनेक गुणांनी युक्त कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. सर्वगुण संपन्न अशा हनुमंताच्या चरित्रातून आदर्श कार्यकर्ता कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत याचे दर्शन घडते.
हनुमंत अत्यंत बुद्धिमान होता. सतत सुग्रीवाचे यश चिंतणारा हनुमंत अत्यंत चाणाक्ष आणि मुत्सद्दी होता. समयसूचकता, उत्तम संघटक, निर्भयता, अशा अनेक गुणांनी मंडित असे हनुमंताचे चरित्र विलक्षण प्रभावी आहे. विलक्षण स्मरणशक्ती लाभलेला हनुमंत स्वयंप्रज्ञ आहे. अत्यंत पराक्रमी हनुमंताचे युध्दकाळामधील रौद्ररूपाचे आवेशपूर्ण वर्णन समर्थ रामदास्वामींनी आपल्या एका स्तोत्रात केले आहे. “अद्भुत आवेश कोपला रणकर्कशू | धर्मसंस्थापनेसाठी दास तो उठिला बळे ||” हनुमंताचा हा रणकर्कश्य आवेश धर्मस्थापनेसाठी आहे. भगवती सीता हे धर्माचे प्रतीक आणि या धर्मस्थापनेसाठी मारुतीरायाने रौद्रावतार धारण करून हा महाप्रलय घडवला. कोणत्याही काळात जेव्हा जेव्हा नकारात्मक विचारांची वावटळ उठेल तेव्हा तेव्हा हनुमंताच्या या रणकर्कश्य आवेशाची आवश्यकता आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
प्रभूरामचंद्रांवर पूर्ण निष्ठा ठेवून लंकेमध्ये येऊन त्याने आपले कार्य पूर्ण केले. काही झाले तरी प्रभू मला तारून नेतील या दृढ विश्वासामुळेच हनुमंत निर्भयपणे आपले कार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकले आहेत. श्रीरामांविषयी अनन्य भाव, श्रीरामांचा अखंड जप, याच बरोबर हनुमंत अखंड कार्यरत राहिले. भक्ती शक्तीचे प्रतीक असणारा हनुमंत निरंतर कर्मयोगी आहेत. अचूक प्रयत्न, स्वयं चिंतन, मनन करून घेतलेले योग्य आणि अचूक निर्णय यातून त्याची कार्यक्षमता लक्षात येते. प्रत्यक्ष युद्धप्रसंगी अनेक अडचणींचे प्रसंग आले तेव्हा मारुतीराया धावून आले आहेत. हनुमंताचा लंकेतील पराक्रम आणि सीता शोधन या कार्यात हनुमंताच्या बुद्धिमत्तेचे तसेच सामर्थ्याचे दर्शन घडते. हनुमंत रामचंद्रांसाठी प्राणार्पण करण्यास तयार असलेला अनन्य सेवक आहे. अनेक गुणांनी संपन्न असूनही त्याला सत्तेची हाव नाही, अधिकार गाजवण्याची त्याची वृत्ती नाही. सर्व प्रभावी गुण असताना देखील नम्र सेवक होऊन राहण्याची त्याची वृत्ती आहे. अत्यंत पराक्रमी आणि सत्वशील हनुमंतामध्ये असणाऱ्या गुणांचे चिंतन करून हे गुण अंगी बाणवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
रामायण या महाकाव्यामध्ये कसे वागावे याबरोबर कसे वागू नये याचा आदर्श देखील ठेवला आहे. जसे रावण ही व्यक्तिरेखा कसे वागू नये हा आदर्श आपल्या समोर ठेवते. रावण हा या महाकाव्याचा खलनायक आहे. त्याचे चरित्र बघितले तर तो अत्यंत पराक्रमी, बलवान, रुबाबदार, बुद्धीमान आहे. श्रेष्ठ शिवभक्त आहे. त्याला संगीताचे उत्तम ज्ञान आहे. पण त्याच्या या गुणांपेक्षा त्याचे अवगुण अधिक प्रभावी ठरतात. दुसर्याच्या मालमत्तेवर नजर असणार्या रावणाने कुबेरची लंका, त्याचे पुष्पक विमान जबरदस्तीने काढून घेतले आहे. ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच’ ही रावणाची वृत्ती आहे. जनहितापेक्षा स्वतःचा स्वार्थ त्याच्यासाठी महत्वाचा आहे. दुसर्याच्या धनावर त्याचे लक्ष आहेच पण परस्त्री वर देखील याची वाईट नजर आहे. रावणाच्या चरित्रात त्याने अनेक स्त्रियांवर जबरदस्ती केली असल्याचे वर्णन येते. त्याने आपल्या नातसुनेवर देखील अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सदाचार, नीतीमूल्ये या सर्व गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या दिसत नाहीत. ‘जसा राजा तशी प्रजा’ याप्रमाणे रावणाने दुसर्याच्या स्त्रीला पळवून आणून आपल्या अंतपुरात डांबून ठेवले तरी जनतेला फारसा फरक पडलेला दिसत नाही. पण जेव्हा हनुमंताने लंका जाळली तेव्हा हे संकट आपल्यावर येत आहे बघून सर्वांना रावण चुकला याची जाणीव झाली. राजा प्रमाणेच जनता देखील स्वार्थी आहे. दुसर्याला दु:ख देणे, दुसर्याला लुबाडणे, परस्त्रीवर नजर ठेवणे, सतत भोगवादामध्ये रमणे या निकृष्ट दर्जाच्या विचारांना आपल्या संस्कृतीमध्ये स्थान नाही.
रामकथा खरी का काल्पनिक किंवा राम वाईट आणि रावण चांगला यावर वाद घालण्यापेक्षा या व्यक्तिरेखांनी जी जीवनमूल्ये आपल्याला दिली त्याचा आदर्श समोर ठेवून आपले व्यक्तिमत्व उत्तम घडवणे हे महत्वाचे आहे. रामायण ही सद्गुणांची कथा आहे. रघुवंशातील कर्मयोगी योद्ध्यांनी सर्वश्रेष्ठ आदर्श समाजासमोर ठेवला आहे. रामकथेतून आपल्या ऋषींनी आपल्या उत्तुंग कल्पनेतून आपल्यासमोर जी जीवनमूल्य ठेवली त्याची जपणूक करून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून सुदृढ समाज बनवणे आपल्या हाती आहे. नेमके काय टिपावे याचे ज्ञान पक्षांना असते. मातीत पडलेले दाणे ते नेमकेपणाने उचलतात, चिखल चिवडत बसत नाहीत. त्याचप्रमाणे या आदर्श ग्रंथातून नेमके काय घ्यावे हा विवेक जागा ठेवून त्याचे ग्रहण करावे. रामराज्य यावे अशी सर्वांची इच्छा आहे पण त्यासाठी राम जन्माला येणे आवश्यक आहे. यासाठी यातील उत्तम विचारांचा प्रवाह पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून ही रामकथा सतत जीवंत ठेवणे हे आपल्या हाती आहे.
|| जय श्रीराम ||