Monday, June 15, 2015

दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ...

दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवता हंता, भव्य सिंदूरलेपना ।।
३ ||

अनाथाचा रक्षक, दीनांना सहाय्य करणारा, हरिरूप असा सिंहासारख्या मारुतीचे वर्णन या श्लोकात केले आहे. जो वानररूप असूनही सुंदर आहे. हनुमंत साक्षात जगदंतर आहेत. भूतमात्राच्या हृदयी राहणारा आहे.पाताळातील अहिरावण महिरावण यांचा ज्याने नाश केला , लंकेचा प्राण घेतला असा हा भव्यरूपातील हनुमंताला शेंदूर अत्यंत प्रिय आहे.
पडता संकट जीवां जडभारी | स्मरावा अंतरी बलभीम ||
बलभीम माझा सखा सहोदर | निवारी दुर्धर तापत्रय||
तापत्रय बाधा बांधू न शके कांही | मारुतीचे पायी चित्त ठेवा ||
ठेवा संचिताचा मज उघडला | कैवारी जोडीला हनुमंत ||
हनुमंत माझे अंगीचे कवच | मग भये कैचे दास म्हणे ||
दिनांनाचे ताप हरण करणारा असा हा हनुमंत. प्रत्येक वेळी दीन अवस्था आर्थिकदृष्ट्याच असते असे नाही. माणसाच्या आयुष्यात ती दीनता आहेच.कितीही मिळाले तरी त्या बाबतीत मनुष्य असमाधानी असतो तो भाग वेगळा. पण अनेक ठिकाणी आत्मविश्वासाचा आभाव आणि त्यामधून येणारी दीनअवस्था अशा दीनाचे तारण करणारा हा दिनानाथ आहे. मनाने दीन असणाऱ्या जीवांच्या मनात आपण अनाथ असल्याचा भाव असतो त्यांना हनुमंत सनाथ करतात. अत्यंत कृपाळू असा हा हनुमंत मनापासून शरण आलेल्यांची या दीनपाणातून सुटका करतो. 
हरीरूपा : हनुमंत हे हरीरूप आहेत. वानर कोणाचीही कोणतीही वस्तू हरण करतो. वनवाटिकेमधून कोणत्याही फळाचे हरण करतो म्हणून त्याला हरी म्हंटले आहे. वानर रुपात आपण अवतार घेतल्याने हनुमंत हरी वानर आहेत. ( संदर्भ: श्री भीमरूपी स्तोत्र प्रसाद ).
हरण करणारा तो हरी. उपासकाची दु:ख, संकट, दुर्भाग्य, याचे हरण करणारा असा हा हनुमंत आहे.
हनुमंत सुंदर आहेत. वानररूप असूनही ते सुंदर आहेत. जे सुंदर असते त्याबद्दल आपल्याला आत्मीयता प्रेम वाटते. हनुमंताच्या रुपाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निरागस भाव जाणवतात. प्रसन्न चेहरा बघून आपला आत्मविश्वास वाढतो. हनुमंता विषयी इतका आपलेपणा वाटतो कि त्याचा एकेरी उल्लेख करताना देखील अवघडल्या सारखे होत नाही. इतका तो आपला वाटतो. सर्वांग सुंदर असे हनुमंताचे रूप आहे.
रूप रसाळ बाळकू | समस्त चित्तचाळकु |
कपी परंतु ईश्वरू |विशेष लाधला वरु ||
हनुमंताचे बालरूप जेव्हढे चित्तवेधक आहे तीच चित्तवेधकता त्यांच्यामध्ये कायम आहे. हनुमंतातील सुंदरता ओळखूनच वाल्मिकींनी हनुमांचे वर्णन ज्याकांडामध्ये केले त्याचे नाव सुंदरकांड असे ठेवले.हनुमंताची सुंदरता चिरकाल टिकणारी आहे. कारण भौतिक जगात देहरूपी सौंदर्याला महत्व आहे पण हनुमंत अंतर्बाह्य सुंदर आहेत.  
याठिकाणी समर्थ हनुमंताला जगन्नाथा म्हणून संबोधत आहेत. समर्थांनी दासबोधातील अकराव्या दशकातील आठव्या समासात ( उपदेश निरुपण ) अंतरात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे हे सांगितले आहे. तो देहामध्ये आत्मा आणि जगामध्ये अंतरात्मा म्हणून वावरतो. समर्थ म्हणतात,
देह्पुरामध्ये ईश |म्हणून तया नाव पुरुष | जगामध्ये जगदीश | तैसे वोळखावा || ११|९|१२|
जाणिव रूपे जगद्न्तरे | प्रस्तुत वर्तती शरीरे | अंत:कारण विष्णू येणे प्रकारे | वोळखावा||
तो विष्णू आहे जगदांतरी | तोची आपुले अंतरी | कर्ता भोक्ता चतुरी | अंतरात्मा वोळखावा ||
जगदांतरी अनुसंधान | बरे पहाणे हेची ध्यान | ध्यान आणि ते ज्ञान | एकरूप ||
जगात राहणारा विष्णूच आपल्या अंतकरणात आहे हा अंतरात्माच खरा कर्ता आणि भोक्ता आहे हे चतुर माणसाने ओळखावे असे समर्थ या ठिकाणी सांगतात. हरीरूपा आणि जगन्नाथ असे समर्थ या ठिकाणी हनुमंताना संबोधत आहेत. जो जगताच्या कणाकणात सामावलेला आहे आणि ज्याच्या मध्ये हे जगात सामावलेले आहे असा हा हनुमंत केवळ देहरूपी हनुमंताचे ज्ञान समर्थ आपल्याला करून देत नाहीत तर त्याचे व्यापकत्व आपल्या समोर मांडत आहेत.
पातालदेवता हंता : ११ वा रुद्र असणारा विष्णूभक्त हनुमंत सतत श्रीरामांचा नामात दंग आहे. जगाच्या अंतरंगात वास करतो म्हणून जगदंतर आहे. अत्यंत पराक्रमी आहे. अहिरावण महिरावण यांनी पूजन केलेल्या देवीचा ज्याने नाश केला आणि श्रीराम आणि लक्ष्मनाचे प्राण वाचवले असे हे पातालदेवता हंता हनुमंत.
भव्य सिंदूरलेपना : हनुमंताना शेंदूर अतिशय प्रिय आहे. त्याच्या भव्य रूपावर शेंदुराचे लेपन केलेले असते. याविषयी एक कथा सांगितली जाते. श्रीरामांचा परमभक्त हनुमान एक दिवस सकाळीच भगवती सीतेकडे गेला. भगवतीवर देखील त्याचे प्रभू इतकेच नितांत प्रेम न श्रद्धा होती. मातेकडे जाऊन त्याने ‘मला भूक लागली आहे’ असे सांगितले.  ‘मी स्नान करून तुला मोदक देते’ असे सांगितले. तोपर्यत हनुमंत श्रीरामनामामध्ये रंगून गेले. स्नान झाल्यानंतर भगवतीने कपाळावर सिंदूर लावलेला हनुमंताने पहिले. सिंदूर लावण्याचे कारण मातेला विचारल्यावर मातेने सांगितले यामुळे तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढते. हे उत्तर ऐकून हनुमंत विचारमग्न झाले. नंतर त्याने आपल्या सर्वांगाला तेल लावून स्वताला अपादमस्तक सिंदूर लावून घेतला. यामागे केवळ प्रभूंचे आयुष्य वाढेल हा एकमेव भाव होता. श्रीरामांविषयीचे उत्कट प्रेम यातून व्यक्त होते...
अहिरावण महिरावण कथा :
इंद्रजीताच्या वधानंतर काय करावे हा रावणासमोर प्रश्न पडला.तेव्हा त्याने अहिरावण महिरावण यांना बोलाविले आणि राम लक्ष्मणाच्या वधाची कामगिरी त्यांच्यावर सोपावली. वानरांच्या कडेकोट बंदोबस्तात असणारे राम लक्ष्मण यांना या दोघांनी आकाशमार्गे येऊन रामलक्ष्मणावर मोहिनी मंत्र घातला आणि जमिनीतून प्रचंड मोठे भुयार खणून कित्येक मैल दूर असलेल्या महिकावती या आपल्या राजधानीला ते या दोघांना घेऊन गेले. सकाळी राजधानीतील भद्रकालीच्या मंदिरात त्यांना बळी देण्याचे ठरले. दधी समुद्राच्या तीरावर मकरध्वज मोठ्या सैन्यासह राजधानीत रक्षण करीत होता. इकडे वानरसेनेला आपले स्वामी नाहीत हे कळाले तेव्हा हनुमंत निवडक सैन्यासह त्या विवरातून गेला. त्याठिकाणी मकरध्वज आणि हनुमंत त्यांचे घनघोर युद्ध झाले. मकरध्वजाने आपले पिता हनुमंत यांचा धावा केला. तेव्हा हनुमंत तुझे पिता कसे असे हनुमंतानेच विचारले. तेव्हा मकरध्वज म्हणाला, लंका जाळल्यावर हनुमंत समुद्र किनारी आला. त्याने आपल्या कपाळावरील घाम बोटाने समुद्रात टाकला.  तो एका मगरीने गिळला.मगरीला गर्भ राहिला तोच हा मकरध्वज. मकरध्वजाने हनुमंताला पुढे सहाय्य केले. त्याच्या सांगण्यावरून हनुमंत महिकावतीला भद्रकालीच्या मंदिरात गेला. त्याने दार आतून बंद केले. आणि तो देवीच्या मूर्तीच्या जागी बसला.
अहि मही आणि इतर राक्षस यांनी भद्रकालीच्या पूजेचे साहित्य आणि बळी म्हणून राम लक्ष्मणाला मिरवणुकीने मंदिरा समोर आणले. दरवाजा आतून बंद बघून सगळे थांबले. आतून मोठ्ठा आवाज आला, भक्तानो कि आज प्रचंड रुप घेतले आहे. ते तुम्हाला पहावणार नाही तेव्हा गाभाऱ्याला मोठ्ठे भोक पाडा आणि तेथूनच पूजेचे साहित्य आत सोडा. सर्व साहित्य आत सोडण्यात आले. सर्व प्रसाद हनुमंताने ग्रहण केला. मग हनुमंताने बळी जिवंतच आत सोडण्यास सांगितले. नंतर त्याने अहिरावणाला आत सोडण्यास सांगितले. त्याचा हनुमंताने चेंदामेंदा केला. चिडलेला महिरावण दार फोडून आत आला. परंतु मही रावणाला मारणे इतके सोप्पे नव्हते.....
मकरध्वजाच्या सांगण्यावरून हनुमंत महिरावणाची पत्नी चंद्रसेना हिच्याकडे गेले. ती रामरायांचे ध्यान करीत बसली होती. तिच्या विनंती वरून हनुमंताने श्रीरामांना त्यांच्या महालात आणण्याचे कबुल केले. परंतु याठिकाणी जर काही संकट आले तर मात्र ते थांबणार नाहीत असे हनुमंताने तिला सांगितले. तेव्हा चंद्र्सेनेने महिरावणाच्या मृत्यूचे रहस्य सांगितले. महिरावण युद्ध करू लागला कि भ्रमर पाताळातून अमृत आणून महीच्या रक्तावर टाकतात. त्यामुळे त्यातुन अनेक महिरावण तयार होतात.  हे समजताच हनुमंत पाताळात गेला व भ्रमरांना ठार मारू लागला. तेव्हा भ्रमर शरण येऊन सांगाल ते काम करतो म्हणाले. हनुमंतांनी त्यांना चंद्र्सेनेने श्रीरामांसाठी तयार केलेला नवा चांदीचा पलंग आतून पोखरायला सांगितले. भुंग्यांनी महिरावणाला अमृत देणे बंद केल्यावर त्याचा अंत झाला. श्रीरामांचा विजय झाला. इकडे श्रीराम चंद्र्सेनेच्या महाली आले आणि तिने सजवलेल्या पलंगावर टेकले आणि पलंग काडकन मोडला. चंद्र्सेनेला वाईट वाटले. तेव्हा श्रीरामांनी तिला सांगितले कि, पुढील कृष्णावतारात सत्यभामा म्हणून कि तुझा स्वीकार करेन. अशा पद्धतीने हनुमंताने राम लक्ष्मणाचे प्राण वाचविले आणि अतुलनीय असा पराक्रम केला.

……………… क्रमशः 

No comments:

Post a Comment