Monday, June 15, 2015

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ....

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।
हनुमंतांनी उड्डाण केल्याचे अनेक प्रसंग वाल्मिकी रामायणामध्ये येतात. यापैकी उत्तरेला उड्डाण करून मंदराचलासारखा द्रोणागिरी पर्वत त्याने उचलून आणला आणि पुन्हा नेऊन ठेवला ही घटना उल्लेखनीय आहे. इंद्रजीताच्या अस्त्र प्रयोगाने वानारसैन्य मृतप्राय झाले होते. ब्रह्मास्त्रास मान देण्यासाठी राम लक्ष्मण मूर्च्छित पडले होते. म्हणून जाम्बुवंताने हनुमानाला औषधी वनस्पती आणण्यास पाठविले. त्यावेळेस त्याने हनुमंताला सांगितले कि, “हिमालयावर  ऋषभ या सुवर्णमय पर्वताच्या व कैलास पर्वताच्या शिखरामध्ये तेजस्वी सर्वोषधी पर्वत आहे. त्या पर्वतावरील मृतसंजीवनी, विशल्यकरणी, सुवर्णकरणी व संधानी या चार महौषधी धेऊन तू ताबडतोब परत ये.”  हनुमंत जेव्हा हिमालयाकडे गेला तेव्हा त्याला बघून पर्वतावरील औषधी वनस्पती गुप्त झाल्या. त्यामुळे हनुमंताना क्रोध अनावर झाला. त्याने ते पर्वत शिखरच उपटून आणले. आपल्या पित्याचे स्मरण केले. द्रोणागिरी वरच्या औषधी वनस्पतीचा सुगंध वायुदेवामुळे सर्वत्र पसरला. त्या सुगंधाने वानरसेना मृत्यूवर मात करून उठून बसली. रामलक्ष्मण देखील शुद्धीवर आले. उपचारा नंतर हनुमंताने हे शिखर पुन्हा जागच्या जागी नेऊन ठेवले होते....
मृतसंजीवनी, विशल्यकरणी, सुवर्णकरणी व संधानी या चार महौषधीचा उल्लेख काल झाला . या चारही औषधांची नावे सुंदर आहेत तशीच सार्थ पण आहेत. त्याविषयी थोडेसे....
विशल्यकरणी : हे अॅनस्थेटिक आहे. हे औषध दिले कि मनुष्य विशल्य होतो म्हणजे त्याला होत असलेल्या वेदना त्याला जाणवत नाहीत.
संधानी : हे औषध दिल्यावर जर कुठे हाडं मोडली असतील तर ती आपोआप जोडली जातात.
सुवर्णकरणी : सुवर्ण म्हणजे चांगला रंग, त्वचेचा रंग उत्तम होण्याकरता पहिल्यांदा शरीरातील रक्त शुद्ध होणे आवश्यक असते. हे औषध तेच काम करते. लक्ष्मणाचा रंग काळा निळा झाला होता. त्यासाठी या औषधाची देखील गरज होती.
मृतसंजीवनी :  सर्व वानर आणि राम लक्ष्मण यांची जी अवस्था झाली होती त्यासाठी या औषधी हनुमंताना आणायला सांगितले होते. या तिन्ही औषधाचा वापर केल्यानंतर आता फक्त एक शॉक देण्याची गरज शिल्लक राहते. हृद्याचे पंपिंग पुन्हा सुरु होण्यासाठी संजीवनी वनस्पतीची गरज होती.
अशा या चार महौषधी..... ( संदर्भ : श्रीराम-कथामृत .. स्वामी गोविंददेव गिरी) 
हनुमंतांनी जो द्रोणागिरी पर्वत उचलून आणला तो मंदराचलासमान आहे असे समर्थ याठिकाणी म्हणतात. समुद्रमंथनाच्यावेळी घुसळण्यासाठी रवी म्हणून मंदार पर्वत उपटून समुद्रा जवळ आणावा लागला होता. स्कंदपुराण, भागवत यातील वर्णनानुसार सर्व देव व राक्षसांनी मिळून जोर लावून मंदारपर्वत उपटला खरा पण त्या सर्वांना मिळून तो समुद्रापर्यंत नेणे शक्य होईना. त्या प्रयत्नात देवांच्या आणि राक्षसांच्या अंगावर तो कोसळल्याने अनेकजण मेले, मूर्च्छित झाले. शेवटी सर्वांनी विष्णूचा धावा केला. तेव्हा गरुड वहान विष्णू त्याठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी एका हाताने लीलया पर्वत उचलून समुद्राकाठी नेऊन ठेवला. असा हा मंदाद्रीसारखा द्रोणागिरी हनुमंतांनी एकट्याने सहज उपटला आणि पुन्हा जागेवर नेऊन ठेवला आणि ते सुद्धा अगदी थोडक्या अवधीमध्ये.
रात्रीच्या रात्रीत उत्तरदिशेला पाच समुद्रांच्या पलीकडे, क्षीरसमुद्राच्या काठी, चार कोटी योजन अंतरावर असलेल्या द्रोणागिरी पर्यंत उडत जाऊन, तो समूळ उपटून, शेपटीत बांधून घेऊन येणे व पुन्हा जागेवर ठेवणे यातील समर्थ आपल्या लक्षात येते. महाबळी, महारुद्र, महावीर, महापराक्रमी अशा या हनुमंताच्या सामर्थ्याची आपल्याला यातून कल्पना येते...
हनुमंताने उड्डाण केले. याठिकाणी तुलसी रामायणामध्ये एक वेगळा प्रसंग सांगितला आहे. हनुमंत वेळेत महौषधी आणता येऊ नये म्हणून रावणाने त्याचा वेळ खाण्याकरता कालनेमिला पाठवले. साधुवेषात आलेला कालनेमी हा खरा तर राक्षस आहे. हनुमंताला चकवण्यासाठी कालनेमीने साधूचा वेष धारण केला. हनुमंताचे अंत:करण स्वच्छ आहे आणि एका महत्कार्यासाठी तो निघाले आहेत. कालनेमीने त्यांचा वेळ खाण्याकरता आणि जमल तर त्यांना ठार मारण्याकरता विषप्रयोग करण्याचे ठरवले. अशा या स्थितीमध्ये एका अप्सरेने मगरीच्या रुपामध्ये येऊन हनुमंताला सावध केले आहे. याचा अर्थच असा कि अंत:करण विशुद्ध ठेऊन भगवंताच्या कार्याकरता जो उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन चालत असतो, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भगवंताला असते. भगवंत कोणत्या रुपात येऊन सहकार्य करेल सांगता येत नाही. हनुमंताने कालनेमिचा नाश केला आणि ते पुढे निघाले आहेत.
वाल्मिकी रामायणामध्ये महर्षींनी या प्रसंगाचे अद्भुत वर्णन केले आहे. हनुमंत जेव्हा या पर्वतावर गेले तेव्हा त्यांना बघून या वनौषधीनी चमकणे बंद केले. तसेच इतक्या वनस्पती बघून नेमक्या कोणत्या वनस्पती घेऊन जायचे हे हनुमंताना समजेना. आता काय करावे? काही गोष्टी चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. हनुमंताने काय कराव. हात जोडून उभे राहिले आहेत. आणि अत्यंत विनयाने त्या वनस्पतींची प्रार्थना केली आहे. “भगवान रामचंद्राच्या कार्याकरता आपली फार तीव्रतेने आवश्यकता आहे. तुमचा कधीही अजिबात दुरुपयोग केला जाणार नाही. मी तुम्हाला प्रार्थना करतो आणि तुम्हाला निमंत्रण देतो. आपण या कार्यामध्ये माझ्या समवेत चालून धन्य व्हा.” ही प्रार्थना करताच त्या वनस्पती पुन्हा चमकायला सुरवात केली आहे...
वनौषधी चमकायला लागल्या हा कथाभाग मनोरंजक कथा म्हणून बघितला जातो. पण आपल्या भारतीय संस्कृतीची धारणा यामागची खूप वेगळी आहे. भारतीय परंपरेची अत्यंत प्राचीन धारणा आहे कि, या सर्व औषधींमध्ये प्राण आहे. मनुष्यामध्ये चेतना आहे तशीच प्राण्यांमध्ये, वनस्पतीमध्ये आहे हे सर जगदीशचंद्र बोस यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. आपल्याला हे सगळे बघता येते. कलकत्यामध्ये असलेल्या बोस इन्स्टिट्यूटमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे. प्रत्येक वस्तूमध्ये चेतनतत्व आहे म्हणून जगातील प्रत्येक वस्तूशी असलेला आपला व्यवहार फार आदरपूर्वक झाला पाहिजे हे भारतीय परंपरेचे आग्रहाचे प्रतिपादन आहे. आपला पाय चुकून एखाद्याला लागला तर आपण पटकन नमस्कार करतो. मग ती व्यक्ती असतो वा वस्तू. या वनौषधीमध्ये चेतना आहे. हे आपण देखील मान्य केलेले असते पण लक्षात येत नाही. कोणतेही औषध घेताना तोंड वाकड करून औषध घेऊ नको असा आई सांगायची त्यामागे हे तत्व आहे हे उशिरा समजल. तुम्हाला विषयांतर झाल अस वाटतय का? J पण तसं नाहीये. याठिकाणी हनुमंत ज्यापद्धतीने वनस्पतींशी व्यवहार करतात तो पाहण्यासारखा आहे. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन वनस्पती पुन्हा पूर्ववत चमकू लागतात ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे.

हनुमंताचे चित्त शुद्ध आहे. जर चित्त शुद्ध असेल तर सगळ्या गोष्टी अनुकूल होतात. प्राणीमात्र, अवघी प्रकृती अनुकूल होते. लो.टिळक मंडेलाच्या तुरुंगात लिहित असताना त्यांच्या खांद्यावर चिमण्या येऊन बसत. तुरुंगातल्या जेलरने लिहून ठेवले आहे, आम्हाला कोणाला कधी चिमण्यांनी स्पर्श केला नाही. कारण आमच्यातील क्रौर्य त्यांच्या लक्षात येते. तुकाराम महाराज जात असताना चिमण्या उडून गेल्या. अजून माझे चित्त शुद्ध झाले नाही याचे त्यांना वाईट वाटले. अंतरंगातून हो शुद्ध झाल त्याला जग अनुकूल झाले. हनुमंताचे अंत:करण किती शुद्ध होते याचा हा प्रत्यय आहे. आणि ही चित्तशुद्धी केवळ नामानेच साध्य होते. आता तुमचा लक्षात आले असेल नाम किती खोलवर घ्यायचे आहे ते....   क्रमशः
( संदर्भ : श्रीराम-कथामृत .. स्वामी गोविंददेव गिरी)  

No comments:

Post a Comment